मनोज गायकवाड मुंढवा, दि. 16 (प्रतिनिधी) -पुणे महापालिकेच्या मुंढवा येथील राजर्षी शाहू महाराज इंग्रजी माध्यम शाळेच्या पहिलीच्या वर्गाला गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षकच नसल्याचा प्रकार पुढे आला आहे. पावसामुळे वर्गखोल्यांनाही गळती लागली असून, “सांग सांग, भोलानाथ पाऊस पडेल काय?’ ऐवजी “सांग सांग, भोलानाथ शिक्षक मिळेल का?’ असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.
दरम्यान, पालकांनी माजी नगरसेविका पूजा कोद्रे यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला. शिक्षक नाहीत; पण शाळा भरवितात आणि सोडून देतात. मुलांना मेंढरांच्या कळपासारखे बसविले जाते. तरी देखील प्रवेश देणे सुरुच आहे, अशा शब्दांत पालकांनी त्रागा व्यक्त केला.
शाळेत इयत्ता पहिलीच्या सी तुकडीत साठ विद्यार्थी असल्याचे पालकांनी सांगितले. या तुकडीला तीन महिन्यांपासून शिक्षकच नाही. वर्ग गळत असल्याने मुलांना पाण्यातच बसावे लागत आहे. यामुळे पालक स्वतःच आपल्या मुलांना दुसऱ्या तुकडीत बसवून येतात; परंतु त्यांची हजेरीही घेतली जात नाही. पालक गौरी भंडारी, मनीषा सरोदे, सारिका कुंभार, रत्नदीप रॉय, गुडीया बेबी, मनीषा राठोड, आम्रपाली वर यांनी कोद्रे यांना याबाबत निवेदन दिले आहे.
यासंदर्भात मुख्याध्यापक श्रीकांत गिरी म्हणाले, “”संबंधित तुकडीसाठी चार-पाच दिवसांत शिक्षक देण्याचे आश्वासन शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला दिले आहे. लवकरच शिक्षकाची सोय होईल. तसेच स्वच्छतागृहाचे काम लवकर सुरू करण्यात येईल. पावसामुळे थोडा विलंब झाला आहे.”
कोद्रे म्हणाल्या, “”चार-पाच दिवसांत जर शिक्षक उपलब्ध केले नाही, तर मुलांना व पालकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल. शाळेत हजारो मुले येत असतात. त्यामुळे शाळेतील स्वच्छतेकडे संबंधित मुख्याध्यापक व स्टाफने लक्ष दिले पाहिजे. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाच तर त्याला जबाबदार कोण?”