नवी दिल्ली – भारताची संपूर्ण आरोग्य यंत्रणा ही देशासाठी अभिमानाचा विषय ठरली असून जागतिक सहकार्य आणि व्यापार या आघाड्यांवर भारत हा विश्वासार्ह जोडीदार होऊ शकतो हे जगाच्या दृष्टीस पडले आहे, असे प्रतिपादन व्यापार आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केले. ते “सीआयआय’ च्या बाराव्या वैद्यकीय-तंत्रज्ञान जागतिक शिखर परिषदेत आज बोलत होते.
भारताला तसेच जगाला आवश्यक औषधपुरवठा होईल ही खात्री देण्यासाठी औषध शास्त्र उद्योग सातत्याने प्रयत्नशील राहिला. कोविड-19 शी लढा देण्यासाठी आवश्यक असलेली उत्पादने निर्माण करण्यासाठी म्हणून वैद्यकीय उपकरणांच्या व्यवसायानेही श्रम घेतले. सामान्य माणसाच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहून त्याद्वारे भारताची सुरक्षितता व कल्याण यांच्या प्रति निष्ठा दाखवून आमचे डॉक्टर आणि आरोग्य केंद्रे ही देशासाठी अभिमानाचा विषय ठरले.
कडक लॉकडाऊन म्हणजे काय आणि वेगवान रोगमुक्ती कशी असते हे जगाला भारताने दाखवून दिले असे आज आपण अभिमानाने म्हणू शकतो.
जगाची औषधांची बाजारपेठ म्हणून उदयाला येण्यासोबतच भारत जगाचे रुग्णालयही बनू शकतो. उर्वरीत जगाला सुविधा, उच्च दर्जाची वैद्यकीय तयारी आणि जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाहीत असे उत्तम उपचार भारतात मिळू शकतील. भारतात वैद्यकीय तंत्रज्ञान उपकरणे हा व्यवसाय नेहमीच आघाडीवर राहिला आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताने विश्वासाचे स्थान पटकावले आहे तसेच रुग्णालयांनीही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली जागतिक मोहोर उमटवली आहे. “आरोग्यपूर्ण रहाणी’ हा आमच्या सरकारचा मंत्र आहे असेही गोयल यांनी नमूद केले.