सोमेश्वरनगर (प्रतिनिधी): सोमेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम संपला असून ऊसतोडणी कामगारांना गावाकडे पाठवण्याची कारखान्याची तयारी सुरू झाली आहे. आज आणि उद्या त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्यांना त्यांच्या गावी पाठविले जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर ऊसतोडणी कामगारांना त्यांच्या गावाकडे पोहचवण्याची जबाबदारी शासनाने संबंधीत साखर कारखान्यांवर सोपविली आहे. यानुसार गेल्या एक महिन्यापासून सोमेश्वर कारखान्याने ४ हजार ऊसतोडणी कामगारांना ३२ लाखांच्या आसपास किराणा माल तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे.
यापुढे कार्यकारी संचालक यादव म्हणाले की, सोमेश्वर कारखान्यावर असलेल्या एकूण चार हजार कुटुंबाची आरोग्य तपासणी आजपासून सुरू झाली असून सोमेश्वर कारखाना मेडिकल स्टाफ तसेच बारामती आरोग्य विभाग, असे मिळून ३ डॉक्टर आणि १० आरोग्य सेवक ही तपासणी करत आहेत. जवळपास १० हजार ३०० च्या आसपास कामगारांची संख्या असल्याने तपासणीला कालावधी लागत आहे. आज दिवसभर तपासणी झालेले ऊसतोडणी कामगार उद्या पासून गावाकडे जाण्यास निघू शकतात
यादव पुढे म्हणाले, सोमेश्वर कारखान्यावर ऊसतोडणी कामगारांची एकूण ४ हजार कुटुंबाची मिळून १० हजार ३०० ऊसतोडणी कामगारांची संख्या आहे. तर जनावरांची ८ हजार ५०० अशी आहे. यांना सुखरूप गावी पोहचविण्यासाठी कारखान्याने ६०० ट्रक टेंपो ची तयारी केली आहे. ऊसतोडणी कामगार, जनावरे आणि वाहनांची यादी साखर आयुक्तांना ऑनलाइन पाठविली असून सोमेश्वर कारखान्यावर राज्यातील १३ जिल्ह्यातून २९ तालुक्यातुन ४२५ गावातील हे सगळे ऊसतोडणी कामगार आहेत.
साखर आयुक्त ही यादी पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पाठवणार असून पुण्याचे जिल्हाधिकारी ही यादी १३ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहेत. प्रत्येक गाव, तालुका आणि जिल्हानिहाय याद्या बनवण्यात आल्या असून ज्या गावातील ऊसतोडणी कामगार असेल त्या यादींवर सुरुवातीला गावच्या सरपंचाचे नाव आणि ऊसतोडणी कामगारांची नावे असणार आहेत.