मुंबई : राज्यात रिक्त झालेल्या ९ विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती करणारे पत्र, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पाठविले आहे. यापूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांनी निवडणूक आयोगाला यांसंदर्भात पत्र दिले होते. शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा यात समावेश होता. विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 24 एप्रिल रोजी संपला आहे.
त्यामुळे नवीन सदस्य निवडून येण्यासाठी एप्रिल महिन्यातच निवडणुकांचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र, राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलली होती. मात्र विधान परिषदेची निवडणूक पुन्हा घ्यावी यासाठी राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोग तसेच राज्यपालांना पत्र दिले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘कोरोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारीजी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो’, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
कोरोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी मा. राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो.
(1/3)#Maharashtra @BSKoshyari— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 30, 2020
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या एकाही सभागृहाचे सदस्य नसल्याने सहा महिन्यांच्या आत त्यांनी निवडून येणे बंधनकारक होते.