कोलकता, -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवार मॉं योजनेचे उद्घाटन केले. त्या योजनेंतर्गत बंगालमधील गरिबांना अवघ्या 5 रूपयांत भोजन उपलब्ध केले जाणार आहे.
ममता सरकारकडून नाममात्र दरात उपलब्ध केल्या जाणाऱ्या थाळीत डाळ-भात, एक भाजी आणि अंडा करी असा मेन्यू असेल. दरदिवशी दुपारी 1 ते 3 या कालावधीत ती थाळी मिळेल. त्यासाठी राज्यभरात टप्प्याटप्प्याने सरकारी स्वयंपाकघरं सुरू केली जातील. ती स्वयं-सहाय्यता गटांमार्फत चालवली जातील. प्रत्येक थाळीसाठी राज्य सरकारकडून 15 रूपये अनुदान दिले जाईल. बंगालमध्ये एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने शर्थ करत आहेत.
आता ममतांनीही गरीब मतदारांना खुष करण्याच्या उद्देशातून अत्यल्प दरात भोजन मिळण्याची व्यवस्था केली आहे. याआधी करोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसने भोजनाची व्यवस्था केली होती.