नवी दिल्ली – करोना विरोधातील लसीकरणाचे काम सुरू आहे. मोहीम सुरू केली तेव्हा प्रचंड गाजावाजा झाला. मात्र त्याचवेळी अफवांचा बाजारही गरम होता. लसीच्या विश्वसनियतेबाबत वेगवेगळ्या माध्यमांतून शंका उपस्थित केल्या गेल्या.
त्यामुळे शंका आणि भीतीचे वातावरण आहेच. आता पहिल्या टप्प्यात ज्यांना लस देण्यात आली त्यांना लसीचा दुसरा डोस देण्याचेही काम सुरू झाले आहे. मात्र देशाच्या अनेक राज्यांत पहिल्याच टप्प्यात लसीकरणाचे जे उद्दीष्ट ठरवण्यात आले होते ते पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे. अशात दुसरा टप्पा कितपत प्रभावी होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
लसीची प्राण कंठाशी आणून वाट पाहिली जात होते. जगभरात 200 ठिकाणी लस निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. एकट्या भारतात 18 ठिकाणी लस शोधण्याचे काम सुरू होते. अखेर संशोधकांना यश मिळाले आणि लस तयारही झाली.
मात्र त्याचवेळी काही ठिकाणी काही घटना घडल्या आहेत. त्यांचाच आधार घेत लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात लसीकरणाला थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. एकट्या बिहार या राज्याने लसीकरणाच्या निर्धारीत लक्ष्याच्या पूर्ततेकडे यशस्वी वाटचाल केल्याचे आकडेवरीवरून स्पष्ट होते आहे.
उद्दीष्ट गाठले न जाण्याची कारणे:
* लसीकरणाबाबत सूचना देणारी एसएमएस प्रणाली सदोष
* वारंवार सर्वर डाउन होत असल्यामुळे वेळेवर मेसेज न मिळणे
* लसीकरण केंद्रांची मर्यादीत संख्या
* राज्यातील आरोग्य विभागाकडे लसीकरणाची सविस्तर रूपरेषा नाही
* आजार, गर्भावस्था अथवा अन्य आरोग्य समस्यांमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी दहा टक्के लोकांना लस दिली गेली नाही
* लसीबाबत होत असलेल्या अपप्रचारामुळे भीतीचे वातावरण
* कोविन ऍपच्या नोंदणीत गडबड अन अडचणी
* आरोग्य विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांनीच लस घेण्याचे टाळले