- अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली आढावा बैठक
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील करोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता महापालिकेची सर्व यंत्रणा करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज ठेवा असा आदेश महापौर माई ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिला. शहरातील करोना बाधितांना वैद्यकीय उपचार घेताना कोणतीही अडचण उद्भवणार नाही याची पूर्णतः खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सर्वंकष आढावा महापौर ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत बुधवारी (दि. ३) झालेल्या विशेष बैठकीमध्ये घेतला. यावेळी उपमहापौर केशव घोळवे, पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आदी उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड-19 लसीकरण केंद्राच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा यंत्रणा नेमावी. करोना विषयक कामकाज करताना करोना बाधित होऊन मरण पावलेल्या मनपा कर्माचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य तसेच अनुकंपा तत्वावर तातडीने नियुक्ती द्यावी. महागड्या रुग्णालयांचे दर सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी महापालिकेने आपल्या रुग्णालयांमध्ये अद्यावत सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देशही महापौर ढोरे यांनी यावेळी दिले.
यावेळी आयुक्त राजेश पाटील म्हणाले, करोनाच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून मनपाच्या वायसीएम रुग्णालयामध्ये 24 तास लॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. मास्क न वापरणाऱ्या तसेच करोना नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे. शहरातील करोना रुग्णवाढ होत असलेले भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहेत. करोना बाधितांवर उपचार करण्यासाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा महापालिकेकडे उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालये देखील अधिग्रहित करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. करोना कामकाजासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांसाठी कॉल सेंटर देखील कार्यान्वित करण्यात आले असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.