देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या तिसर्या टप्प्यातील मतदान आज मंगळवारी होत आहे. 93 लोकसभा मतदारसंघातील मतदार आपल्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद करतील. आधीच्या दोन टप्प्यांत एकूण 190 मतदारसंघात मतदान झाले असून आजचे 93 मतदारसंघ लक्षात घेतले तर निम्म्याहून अधिक मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सुदैवाने या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये कोठेही मोठे हिंसक प्रकार झाले नाहीत, पण निवडणूक आयोगाच्या संबंधातील तक्रारी आणि आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा मात्र पाऊस पडला आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाने विलंबाने जाहीर केल्याचा मोठा आक्षेप आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर अकरा दिवसांनी आणि दुसर्या टप्प्यांतील मतदान झाल्यानंतर चार दिवसांनी मतदानाची अधिकृत टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
या विलंबावर विरोधक जोरदार आक्रमक झालेले दिसले. त्यातही निवडणूक आयोगाने केवळ मतांची टक्केवारीच जाहीर केली आहे. पण प्रत्यक्ष मतदान किती जणांनी केले आणि एकूण मतदार किती नोंदवले गेले होते याचा तपशील मात्र निवडणूक आयोगाने दिलेला नाही. या पुढील टप्प्यांत तरी मतदानाचा सारा तपशील जाहीर होईल आणि टक्केवारी विनाविलंब जाहीर होईल याची दक्षता घ्या अशा मागणीची निवेदने निवडणूक आयोगाकडे धाडण्यात आली आहेत. त्याचा काय परिणाम होईल हे आताच सांगता येणार नाही, पण आयोगाकडून व्यक्त करण्यात आलेली ही माफक अपेक्षा आहे. ती पूर्ण झाली तर लोकांची निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हता टिकून राहणार आहे. निवडणूक आयोगच काही तरी लपवाछपवी करीत आहे असा जर समज जनतेत निर्माण झाला तर एकूणच प्रक्रियेला बाधक ठरणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीच्या प्रक्रियेची घोषणा करण्यासाठी जी पत्रकार परिषद घेतली होती, त्यात त्यांनी आचारसंहितेचे कडक पालन केले जाईल, पक्षपातीपणा हेाणार नाही आणि सर्वच राजकीय पक्षांना समान लेव्हल प्लेईंग फिल्ड निर्माण केले जाईल असे म्हटले होते.
पण प्रत्यक्षात मात्र ही बाब होताना दिसलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मोदींनी काँग्रेस जाहीरनाम्यावर आक्षेप घेताना काँग्रेसची सत्ता आली तर ते तुमचे मंगळसूत्र हिसकावून घेतील, तुमची दोन घरे असतील तर त्यातील एक घर ताब्यात घेतील आणि त्याचे वाटप मुसलमानांना केले जाईल अशा आशयाची विधाने केली होती, त्याला काँग्रेसने अधिकृतपणे आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने मोदींना नोटीस पाठवण्याऐवजी भाजप अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांना नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोग मोदींना नोटीस काढायला घाबरला का, असा सवालही काँग्रेस व अन्य पक्षांकडून उपस्थित केला गेला आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच की, निवडणूक आयोगाने हे सारे आक्षेप लक्षात घेऊन उर्वरित टप्प्यांमध्ये असा कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. बाकी राजकीय आघाडीवर पहिल्या दोन टप्प्यांविषयी दोन्ही बाजूंनी विजयाची जोरदार दावेदारी केली गेली असली तरी विरोधकांकडून केली गेलेली दावेदारी अधिकच जोरदार होती.
मोदी सरकारचा पराभव होणार हे पहिल्या दोन टप्प्यातच निश्चित झाले असून तिसर्या टप्प्यात त्यावर शिक्कामोर्तब होईल असा दावा आजच काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी काँग्रेस मुख्यालयातील पत्रकार परिषदेत केला आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या प्रोफेशनल्स, लेखक आणि तांत्रिक बाजू सांभाळणार्या लोकांना कसा त्रास दिला जातोय त्याचीही कहाणी ऐकवली आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया हाताळणार्या टीमच्या लोकांची पोलिसांनी धरपकड केली असून त्यांची यंत्रसामग्रीही उचलून नेण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मोदींनी व भाजपने असली आडून कारवाई करून दहशत निर्माण करण्याऐवजी समोर येऊन आमच्याशी दोन हात करावेत असे आव्हान त्यांनी दिले आहे. त्यामुळे ऐन निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सरकारकडून होणार्या या कारवायांचा विषयही ऐरणीवर आला आहे. त्याबाबतही निवडणूक आयोगाकडून अधिक सक्रियता अपेक्षित आहे. उद्या होणार्या तिसर्या टप्प्यातील निवडणुकीत महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघात निवडणूक होत आहे.
या अकरा मतदारसंघांपैकी सर्वात लक्षवेधी लढत बारामती लोकसभा मतदारसंघात होत आहे. पवारांच्याच घरातील दोन महिलांमध्ये होणारी ही निवडणूक विलक्षण औत्सुक्याची ठरली आहे. सार्या देशाचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागले आहे. बारामतीवर वर्चस्व नेमके कोणाचे दादांचे की साहेबांचे याचा निवाडा उद्याच्या मतदानात होणार आहे. महाराष्ट्रात तिसर्या टप्प्यात रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात लढती होत आहेत. येथील सर्वच लढती हायप्रोफाइल आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातील प्रचाराचा पोत बर्यापैकी चांगला राहिला हे येथे नमूद करणे आवश्यक आहे. राजकीय चिखलफेक काही प्रमाणात झालीही पण ती फार पातळी सोडून नव्हती हे आपले सुदैव म्हणायचे. देशाची लोकशाही आणि घटना टिकवण्यासाठी या निवडणुकीला नेहमीपेक्षा अधिक महत्त्व असल्याचे दावे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून केले जात आहेत.
तिकडे सत्ताधारी भाजपने पुन्हा आपला सारा रोख धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच तिसर्या टप्प्याच्या मतदानाच्या दोन दिवस आधी काश्मिरात पुंछ येथे लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाला. त्यात हवाईदलाचा एक जवान शहीद तर अन्य चार जण जखमी झाले आहेत. त्यावरूनही आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. हा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून केला गेलेला राजकीय स्टंट असल्याची टीका पंजाबातील काँग्रेस नेते चरणजीतसिंग चन्नी यांनी केला आहे, तर राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यानेही तीच री ओढली आहे. मात्र, विरोधी पक्षांचे लोक शहीद झालेल्या जवानांचा या निमित्ताने अवमान करीत आहेत असे भाजपचे नेते म्हणू लागले आहेत. त्यामुळे हा विषय आता उर्वरित टप्प्यांतही सुरूच राहण्याची चिन्हे आहेत. आजच्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर कोणत्या बाजूकडून किती जोरकसपणे विजयाचे दावे केले जातात त्यावरून एकूण रागरंग लोकांच्या बर्यापैकी लक्षात येईल.