नवी दिल्ली- खासदार म्हणून निवडून आलेल्या तसेच राज्यसभा सदस्य असलेल्या लोकप्रतिनिधींना आणि मंत्र्यांना राजधानी दिल्लीत निवासासाठी बंगले दिले जातात. त्यांचे आकार आणि सुविधा वेगवेगळ्या असतात. संबंधित व्यक्ती मंत्री असेल अथवा सभागृहाचे सदस्य असतील तोपर्यंत ठिक. मात्र बरेच नेते त्यांची टर्म संपून बराच कालावधी लोटल्यानंतरही बंगले सोडत नाहीत.
केंद्रातील मोदी सरकारने याबाबत मात्र कडक धोरण स्विकारले असून अशा नेत्यांना बंगले एकतर सोडावे लागले आहेत, किंवा त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यात सर्वपक्षीय नेत्यांचा अगदी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचाही समावेश आहे.
मिळालेल्या बातमीनुसार बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनाही त्यांना देण्यात आलेला टाइप 3 श्रेणीतला मोठा बंगला गेल्याच आठवड्यात सोडावा लागला आहे. आता दिल्लीतच अन्य लहान बंगल्यात त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मायावती यांनी त्यांची राज्यसभेची मुदत संपण्याच्या एक वर्ष अगोदरच राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्या या सभागृहाच्या सदस्या नाहीत. मात्र 2017 पासून बंगला त्यांच्याकडेच होता. तो त्यांनी गेल्या आठवड्यात खाली केला. त्यांच्याच पक्षाचे नेते सतीशचंद्र मिश्रा यांच्याकडे असलेल्या बंगल्यात त्यांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे बसपाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान आणि त्यांचे माजी खासदार पुत्र चिराग पासवान यांचेही बंगले सरकारकडून खाली करून घेण्यात आले आहेत. केवळ तेच नव्हे, तर मंत्रिपदावर राहीलेले भाजपचे नेते राज्यवर्धन राठोड, पी. सी. सारंगी, रामशंकर कठेरिया, रतनलाल कटारिया या माजी मंत्र्यांचेही बंगले खाली करण्यात आले आहेत.