- “व्हॅलेंटाइन डे विशेष : गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 40 टक्के निर्यात घटली
- करोना महामारी, चक्रीवादळ, अवकाळी पावसाने गणित बिघडले
पवनानगर – आधी लॉकडाऊन, मग चक्रीवादळ, नंतर अवकाळी पाऊस आणि आता पुन्हा एकदा परदेशातील सुरू होणारे लॉकडाऊन गुलाब उत्पादकांसाठी “काटेरी’ ठरले. दरवर्षी हमखास नफा मिळवून देणारा “व्हॅलेंटाइन डे’ने पुरती निराशा केली. शेतकऱ्यांवर करोना महामारीने संक्रांत आणली आणि “व्हॅलेंटाइन डे’ला तब्बल 30 कोटींहून अधिक फटका बसल्याचे गुलाब उत्पादकांनी बोलून दाखविली आहे. याशिवाय गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुमारे 40 टक्के फुलांची निर्यात कमी होऊन भावही कोसळल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फूल उत्पादन मावळ तालुक्यात होते. तालुक्यात 350-400 हेक्टर क्षेत्रावर पॉलीहाऊस शेती आहे. यामध्ये 250 हेक्टर क्षेत्रावर गुलाब शेती केली जाते. उर्वरित 25 हेक्टर क्षेत्रावर जरबेरा, कार्नेशन व अन्य भाजीपाला पिके घेतली जातात. दरवर्षी फुले देशासह परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात होत असतात. व्हॅलेंटाइन’ काळात या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. जपान, इंग्लड, फ्रान्स, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, दुबई या देशात विशेष मागणी आहे. मात्र गतवर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे बहुतेक मावळातील 331 शेतकऱ्यांच्या सुमारे 200 हेक्टर क्षेत्रावरील पॉलीहाऊसला फटका बसला. त्यामुळे यंदा उत्पादनावर परिणाम झालेला दिसून येतो.
शासकीय मदत मिळाली नसली तरी आधी लॉकडाऊन, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या संकटाशी दोन हात करीत शेतकऱ्यांनी पुन्हा उभारी घेत फूलशेती फुलवली आहे.
मावळ तालुक्यातील गुलाबाला परदेशात विशेष मागणी असते. पण यंदा मात्र करोना महामारीमुळे त्यांच्यावर संकट कोसळले आहे.
पंधरा वर्षांपासून गुलाबाची शेती करणारे गुलाब उत्पादक शेतकरी मुकूंद ठाकर यांनी सांगितले की, गतवर्षी “व्हॅलेंटाईन डे’साठी तब्बल पाच लाख गुलाबांची निर्यात केली होती. या निर्यातीतून तब्बल पंच्याहत्तर लाखांची उलाढाल त्यांनी केली होती. पण यंदा परदेशात अद्याप करोना थैमान घालतोय, परिणामी गुलाबाच्या मागणीत 40 टक्क्यांनी घट झाली आहे. शिवाय फुलांच्या दरात कपातही झाली आहे. अशीच काहीशी परिस्थिती प्रत्येक गुलाब उत्पादक शेतकऱ्यांची आहे.
हवाई मालवाहतुकीच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ
विशेष म्हणजे देशातील गुलाब फुलाच्या उत्पादनात मावळ तालुक्याचा 50 टक्के वाटा असतो. याच वाट्यातील पस्तीस टक्के फुलांची निर्यात एकट्या युकेत होते. मात्र सध्या तिथे करोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. तर हॉलंडमध्येही लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता आहे. तसेच काही देशातील विमान सेवा ठप्प करण्यात आली आहे. दुसरीकडे हवाई मालवाहतुकीच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा गुलाब फुलाच्या मागणीत 50 टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल 30 कोटींचा फटका सहन करावा लागेल, असे मावळ फूल उत्पादक संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
…म्हणून फूल उत्पादक शेतकरी मोटाकुटीला
फूल उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2020 हे वर्षे संकटाचे गेले आहे. या वर्षात एका मागे एक अशा अनेक संकटांनी गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचे अक्षरक्षः कंबरडे मोडले आहे. याची कसर या “व्हॅलेंटाइन डे’मधून भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसली. मात्र ज्या परदेशी बाजारपेठेवर हा शेतकरी अवलंबून होता. तिथे पुन्हा एकदा करोनाने थैमान घातल्याने हा शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
गेल्या वर्षी परदेशी बाजारात पंधरा रुपयांचा दर मिळाला होता. यंदा दर केवळ 12 रुपयेच मिळाला. तसेच उत्पादन आणि निर्यातीत झालेल्या बदलामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्के नुकसान सहन करावे लागत आहे. विमान सेवा अद्याप ही सुरळीत न झाल्याने ही परिस्थिती आमच्यावर ओढावली आहे. तर दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाचाही फटका आम्हाला सहन करावा लागत आहे. या आंदोलनामुळे अपेक्षित बाजारपेठेत गुलाब पोहचू शकत नाही. तो स्थानिक बाजारात कवडीमोल किंमतीत द्यावा लागतोय.
– मुकुंद ठाकर, अध्यक्ष, पवना फूल उत्पादक संघ.