अकोले (प्रतिनिधी) –अकोले नगरपंचायती अंतर्गत येणार्या रायगडनगरात बिबट्याने आतापर्यंत सहा ते सात कुत्री फस्त केली आहेत. आता शिकारच शिल्लक न राहिल्याने बिबटे परिसरात खेळणार्या लहान मुलांवरही हल्ले करू शकतात, अशी भीती येथील रहिवाशांनी व्यक्त करून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.
रायगडनगर उपनगराच्या शेजारी असलेल्या उसाच्या शेतात दोन बिबटे अनेक महिन्यांपासून आश्रय करून आहेत. अगदी सायंकाळी मावळतीला आणि पहाटे उजेड होताना या बिबट्यांचे दर्शन येथील रहिवाशांना झालेले आहे. हे बिबटे रात्री बाहेर पडून कुत्र्यांची शिकार करतात. आतापर्यंत या बिबट्यांनी या उपनगरातील सहा ते सात कुत्र्यांचा फडशा पाडला आहे.
आता या उपनगरात एकही कुत्रे शिल्लक न राहिल्याने शिकारीला चटावलेल्या या बिबट्यांकडून या परिसरात खेळणार्या एखाद्या लहान मुलाबाबतही दुर्दैवाने घटना घडू शकते, अशी भीती येथील राहिवाशांनी व्यक्त केली आहे.लागूनच उसाचे क्षेत्र आहे. त्याच्या आश्रयाने हे बिबटे येथे मुक्कामास आहेत. जोपर्यंत हा ऊस तोडला जात नाही, तोपर्यंत बिबटे येथून जाणार नाहीत, अशी भावना नागरिकांची आहे.
पिंजर्याकडे फिरविली बिबट्याने पाठ
दरम्यान यापूर्वी नागरिकांनी केलेल्या मागणीवरून वनविभागाने या परिसरात पिंजराही लावला. येथील नागरिकांनी त्यात सावज म्हणून कोंबड्याही ठेवल्या. मात्र पिंजर्याच्या बाजूला फिरकूनही बिबट्याने शिकारीसाठी पिंजर्यात जाणे टाळले. मात्र आठ दिवस पिंजरा ठेवूनही बिबट्या जेरबंद होत नसल्याने आणि पिंजर्यालाही मागणी आल्याने वनविभागाने तो पिंजरा इतरत्र मागणी केलेल्या तेथे नेऊन लावला आहे.