कराड – कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महविकास आघाडीला यश आले असून 32 वर्षे भाजपकडे असलेला मतदारसंघ भाजपला गमवावा लागला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या विभागात अंतर्गत विरोध पुढे आला असून जनतेनेही भाजपला डावलल्याचे दिसून आले. याचा दूरगामी परिणाम होणार आहे. या निकालावरून जातीयवादी पक्षांना रोखण्यात महाविकास आघाडीला यश आल्याचे स्पष्ट होत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हा प्रयोग राबवणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी इंद्रजीत चव्हाण, मनोहर शिंदे उपस्थित होते. आ. चव्हाण म्हणाले, राज्यात भाजपविरोधी वातावरण निर्माण होत असल्याने राज्य सरकार निवडणुका पुढे ढकलत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही येत्या विधानसभेआधी तरी होतील की नाही? याबाबत शंका आहे. यामध्ये न्यायालयाचाही हस्तक्षेप होत असून भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे.
म्हणूनच कॉंग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली “भारत जोडो’ यात्रा काढली. त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कॉंग्रेसने आता “हात से हात जोडो अभियान’ हाती घेतले असून अधिवेशन संपल्यानंतर या अभियानाला आणखी गती मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार असून काही दिवसातच याचा निर्णय होईल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही विश्वासार्हता राहिलेली दिसून येत नाही. जुन्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक तशीच ठेवून रिटर्न निर्णय घेतले जात आहेत. परंतु, निवडणूक आयोगावर नवीन आयुक्तांची नेमणूक करण्यात यावी, असे आमची मागणी आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.