पुणे – जिल्ह्यातील शिरवटा (ता.मावळ) येथे 1,800 मेगावॅट आणि रायगड जिल्ह्यातील भिवपुरी (ता.कर्जत) येथे 1 हजार मेगावॅट क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करणार आहे. यामुळे राज्यात वीजनिर्मितीसाठी आणखी दोन प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. या प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासन व नॅशनल टाटा पॉवर लि. कंपनी यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी ऊर्जा विभाग प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, विश्वास पाठक, नॅशनल टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा, विनय नामजोशी, प्रभाकर काळे, अभिजीत पाटील उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. ाज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन आणि मे.नॅशनल टाटा पॉवर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार महत्त्वाचा ठरणार आहे. भविष्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प अधिक महत्त्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत. 2800 मेगावॅटच्या या प्रकल्पांसाठी सामंजस्य करार होणे ही महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त जागा असलेले राज्य आहे. अशा सर्व उपयुक्त जागांचा उपयोग करण्याचा प्रयत्न शासन करत आहे. त्यासाठी राज्य शासनाने चांगले धोरण तयार केले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात सुमारे 12 हजार 500 कोटी रुपये इतकी गुंतवणूक होणार असून सुमारे 6 हजार इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. ही प्रकल्प ठिकाणे टाटा पॉवर कंपनीने संशोधन करुन स्वत: शोधली आहेत.’
उदंचन जलविद्युत प्रकल्प म्हणजे काय?
उदंचन जलविद्युत प्रकल्प नवीकरणीय ऊर्जेचा भाग असून ते बॅटरी स्टोरेजप्रमाणे कार्य करतात. यामध्ये सौर, पवन किंवा अन्य नवीकरणीय ऊर्जेद्वारे खालच्या जलाशयातून वरच्या भागातील जलाशयात पंपिंग मोडद्वारे पाणी घेऊन या पाण्याचा वापर जलविद्युत निर्मतिीसाठी केला जातो. यामध्ये उंचीचा उपयोग करून पाण्याचा फेरवापर करून वीजनिर्मिती केली जाते. या प्रकल्पांमध्ये दोन जलाशयांचा वापर केला जातो. विजेच्या जास्त मागणीच्या काळात उंचावरील जलाशयातील पाण्याचा वापर करून वीजनिर्मिती करण्यात येते. सोडलेले पाणी खालच्या जलाशयात साठविण्यात येते. यानंतर विजेच्या कमी मागणीच्या काळात ते पाणी स्वस्त वीज वापरून पुन्हा वरच्या जलाशयात सोडले जाते.