आळंदी -माउलींची कार्तिकी सोहळा अवघ्या अवघ्या सहा दिवसांवर (दि. 8 ते 14 डिसेंबर) येऊन ठेपला आहे. तरीदेखील प्रशासन, शासनाने अद्याप काहीही निर्णय जाहीर केलेला नाही. तर पंढरपूरच्या धरतीवर आळंदीत रविवार (दि. 6) ते मंगळवार (दि. 18) संचार बंदी आणि वाहतूक बंद करावी, अशी शिफारस पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे आळंदीतील सोहळा रद्द केल्याच्या आफवेला पेव फुटला आहे. त्यामुळे आळंदीकरांसह वारकरी संप्रदाय संभ्रमात आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थात कार्तिकी सोहळा ही येत्या मंगळवार (दि. 8) ते सोमवार (दि. 14) या कालावधीत पार पडणार आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनकडून अद्याप काहीही निर्देश न आल्याने आळंदी देवसंस्थाकडूनही अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. शासनाकडून निर्णयाची प्रत प्राप्त होताच पुढील कार्यवाही आणि वारीची तयारी करू, असे देवसंस्थान, नगर पालिका, पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये तसेच व्यापाऱ्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे.
कार्तिकी सोहळ्या संदर्भात जिल्हा अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात एक बैठक घेतली. त्यात करोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दि. 6 ते दि. 15 डिसेंबरपर्यंत आळंदी व आसपासच्या परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामध्ये पंढपूरच्या धरतीवर शिफारस करण्यात आली आहे. तसेच माउली मंदिर परिसरात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच आळंदीकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
औद्योगिक वाहतुकीसाठीही रस्ते बंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उद्योग नगरितील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून बायपासचा वापर करण्यात येणार असल्याच्या सूचना या बैठकीत वाहतूक विभागाकडून देण्यात आल्या आहेत. संचारबंदी लागू होणार का आणि ती किती दिवस असेल यावरूनही अलंकापुरी नगरिमध्ये अफवांना पेव फुटले आहे तसेच शासनाच्या कार्यपद्धतीवर देखील वारकरी भाविक नागरिक व्यापारी तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
…तर मोठा फटका बसणार
कार्तिकी सोहळ्यावर आळंदीतील अनेकांचे वार्षिक गणिक अवलंबून असते. जर पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार आळंदीत संचारबंदी लागू झाल्यास सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसणार आहे. आळंदीसह पंचक्रोशीतील गावांमधील व्यवसाय देखील यामुळे बंद राहणार आहेत. तसेच औद्योगिक क्षेत्रालाही ही मोठा फटका बसणार आहे.
तर दुसरीकडे काही वारकरी आपल्या गावातून पायी दिंडी घेऊन आळंदीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. तर काही वारकरी अगोदरच आळंदीत येऊन धर्मशाळा, मठ, मंदिरांमध्ये विसावले आहेत. मात्र, वारीची पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने असेल याच याचा निर्णय अद्यापही गुलदस्त्यात असल्याने सर्व क्षेत्रात नाराजी दिसून येत आहे.
परंपरा जपली जाणार, पण…
कार्तिक यात्रेनिमित्त वारकऱ्यांचा मुक्काम आळंदीत राहणार आहे. परंपरेनुसार पंढरपूरातून आळंदीतील कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या श्री पांडरंग, संत नामदेवराय, संत पुंडलिकराय या तीन दिंड्यांना राज्य शासनाने पायी वारीऐवजी तीनही दिंड्यांसोबत प्रत्येकी 20 लोकांना आळंदीत येण्यासाठी परवानगी दिली आहे. त्या तीन दिंड्यांसाठी स्वतंत्र एसटीची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.