मुंबई – रिफायनरी प्रकल्पाविरोधात रत्नागिरीमध्ये बारसू येथे आंदोलन पेटले आहे. हजारो ग्रामस्थांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या 25 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, आंदोलन करणाऱ्या महिलांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलक तिथून हटले नाहीत तर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवलं जाईल, अशी भीती यावेळी राऊतांनी व्यक्त केली.
संजय राऊत म्हणाले की, “बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. कालपासून सुमारे 5 ते 6 हजार लोक बारसूच्या माळरानावर जमले आहेत. आम्ही मरू गोळ्या खाऊ पण मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे पोलिसांना हाताशी धरून बारसूमधील रहिवाशांवर ज्याप्रकारे खारघरमध्ये सदोष मनुष्यवध केला, त्या प्रमाणे गोळ्या चालवू, अशा धमक्या दिल्या जात आहेत.”
“आज पाच हे सहा हजार कुटुंबं विरोध करण्यासाठी माळरानावर जमलेली आहेत. जे बारसूचे रहिवासी मुंबईत राहत आहेत आणि ज्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे त्यांच्या मुंबईतील घरांवर लाथा मारून पोलीस घरात घुसताहेत. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. मुंबईतील बारसूवासियांना अटक केली जात आहे, “असा आरोप संजय राऊत यांनी केला.
यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर देखील टीका केली. ते म्हणाले, “हे अत्यंत विकृत आणि दहशतवादी मनोवृत्तीचं सरकार आहे. बारसूमधील हे लोक तिथून हटले नाही, तर त्यांच्यावर गोळ्यासुद्धा झाडल्या जातील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवलं जाईल, अशी मला भीती वाटत आहे. ” असेही संजय राऊत म्हणाले.