पिंपरी – सध्या २१ व्या शतकातील शाश्वत मुल्ये लक्षात ठेऊन, आव्हानांचा विचार कलासृष्टीने काम करणे गरजेचे आहे. समृद्ध रसिक तयार करण्याचे काम मराठी नाट्यसंस्कृतीने केले. देशात नाट्यभूमी टिकविण्यात सर्वोत्तम भूमी मराठी रंगभूमी आहे. ती टिकविणे, जगविणे हे आपले काम आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते. या वेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, आयुक्त शेखर सिंह, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल या वेळी उपस्िथत होते.
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, नाटकाचा भाव सर्वांपर्यंत पोचावा. नाट्यगृहात तिकिटे काढून नाटक पहावे. नाट्य रसिक इतके वाढवे की असा एक दिवस येऊ की नाट्यगृहचे भाडे दुप्पट करा म्हणण्याइतके चांगले दिवस येणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात ७५ नाट्यगृह बनवत नाही तोपर्यंत आम्ही देखील आमची पदे सोडणार नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. आम्ही नाट्य रसिक आहोत. मात्र इथे आम्ही नाटके करतो असे सांगून आमचे विडंबन केले की काय हे कळले नाही. मात्र नाटकात देखील राजकारण वाढले असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. मंत्रालयात फाइल लवकर पुढे सरकर नाही ही वस्तूस्िथती आहे. त्याबाबत मी देखील बोललो आहे. त्यावर मार्ग निघेल. नाट्यगृहात आधुनिकता आणण्याची योजना राज्य सरकारने केली आहे. एका हृदयातून दुसऱ्या हृदयापर्यंत आवाज पोचविण्याचे काम नाटक करते.
केवळ नाटक करणाऱ्यांना लोक घरी बसवितात : उपमुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की आम्हाला सिंहासन चित्रपटाची आठवण येते, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता उपरोधिक टिका केली. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम असल्याचे देखील ते म्हणाले. तसेच तीन घंटा वाजल्या की आनंद होतो. मात्र आमची तीसरी घंटा आचारसंहितेची असते. कसलेला पैलवान असला की तो यामध्ये यशस्वीच होतो. केवळ नाटके करणाऱ्यांना मतदार घरी बसवितात हे आपण पाहिले असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आम्ही २०१९ मध्ये प्रयोग केला तेव्हा कट्यार काळजात घुसलीचा अनुभव आला. मात्र २०२३ मध्ये आम्ही प्रयोग केला तेव्हा आत्ता होती गेली कुठे, अशी अवस्था झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.