अविनाश धर्माधिकारी
आपली भाषा-इतिहास-संस्कृती अधिक समृद्ध करतच विश्वाच्या एकात्म “स्व’त्वाकडची वाटचाल करायला हवी. आपल्या प्रादेशिकतेच्या तीव्र भानामधूनच वैश्विकतेचा अनुभव घेता येणार आहे. तसे आपण मराठी-भारतीय कुटुंबामध्ये जन्माला आलो ना, तर आता आपल्या खांद्यावर तो मराठी-भारतीय झेंडा आहेच. तो जन्मजात आहे, जन्मभर आहे. तो खाली ठेवू म्हटलं तरी ठेवता येत नाही. कारण आपलं अस्तित्व हाच आपल्या संस्कृतीचा झेंडा आहे. नॉम चॉम्स्कीसारखा भाषाशास्त्रज्ञ सांगतो की,
भाषेचं “सर्किट’ आपल्या मेंदूमध्ये जन्मजातच आहे. कॉम्प्युटरच्या जमान्यात त्याला कोणी शब्द वापरेल की आपल्या मेंदूतच भाषेचं “प्रोग्रॅमिंग’ करणारं “सॉफ्टवेअर’ आहे. या “सर्किट’ किंवा “प्रोग्रॅम’ची मोडतोड करून आपण नव्या मातीत, नव्या भाषेचं सर्किट तयार करत गेलो तर हेही नाही अन् तेही नाही अशी ना अत्र ना परत्र अशी स्थिती होईल. हे शास्त्रीय सत्य दुसऱ्या, तिसऱ्या, दहाव्या, पन्नासाव्या पिढीलाही लागू आहे. आपल्या मूळ भाषेचं “सर्किट’ कायम ठेवत नव्या नव्या भाषा संस्कृतीकडून ऊर्जाग्रहण करत गेलो तर प्रतिभाशाली व्यक्तित्व घडेल.
पंडित जवाहरलाल नेहरू आधी जगभर भारताचं प्रतिनिधित्व करताना सुटाबुटात जायचे. त्यांना पॅरिसच्या परिषदेत कोणातरी विलायती विद्वानानं विचारलं की तुमच्या देशाला स्वत:ची काही वेशभूषा आहे की नाही. त्यानंतर मुद्दा पटल्यासारखे पंडितजी भारताचं प्रतिनिधित्व करताना कटाक्षानं सलवार-कुडता-जॅकेट परिधान करत असत. गुरुदेव टागोरांनी जपानमधील विद्यापीठात भारतीय संस्कृतीच्या, अध्यात्म विचाराच्या थोरवीबाबत प्रभावी भाषण दिलं. जागतिक बंधुता आणि शांतता भारतीय अध्यात्म विचाराच्या अनुकरणामुळे प्रस्थापित होईल असं सांगितलं. ते सर्व मनापासून ऐकून एका जपानी विद्यार्थ्यानं नम्रपणेच विचारलं होतं की गुरुदेव आपले विचार थोर आहेत, आम्ही त्यानं प्रभावित झालो आहोत, पण कृपा करून हे सांगा की ज्या देशाला स्वत:चं स्वातंत्र्य टिकवता येत नाही अशा परतंत्र, गुलाम देशाचं आम्ही- जगानं अनुकरण का करावं!
ज्याला आपलं “स्व’त्व समजतं तोच नवेनवे अनुभव घेत, नव्या भाषा-तंत्रज्ञान शिकत मूळ “स्व’त्व समृद्ध करू शकतो. कुसुमाग्रजांच्या “स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ या “फटक्या’मधल्या काही ओळी आहेत-
“परभाषेतही व्हा पारंगत
ज्ञानसाधना करा तरी
माय मराठी मरते इकडे
परकीचे पद चेपू नका’
ते असं म्हणतात कारण ते काही इंग्रजी किंवा अन्य कोणत्याही भाषा-संस्कृतीचे शत्रू आहेत म्हणून नव्हे, तर त्यांना हे उमगलेलं आहे, की-
“भाषा मरता देशहि मरतो
संस्कृतीचाही दिवा विझे’ आपल्या भाषा-संस्कृतीवर प्रेम करायला दुसऱ्याचा द्वेष करायची आवश्यकता नाही. द्वेष ही नकारात्मक, विघातक भावना आहे. आवश्यकता आहे आपल्या भाषेच्या, संस्कृतीच्या अभ्यासातून तयार होणाऱ्या सार्थ जाणिवेची. किंबहुना “स्व’त्वाच्या अशा सार्थ जाणिवेतूनच आपल्याला अन्य भाषा-संस्कृती-इतिहास-धर्म यांची सुद्धा समज येते, प्रेम वाढू शकतं. काही वर्षांपूर्वीपर्यंत असं पोटापाण्यासाठी किंवा चांगल्या संधींच्या शोधार्थ जगभर जाण्यात-मायभूमी सोडण्यात-काही संवेदनशील मनांना तरी त्रास झाला असेल. कदाचित अपराधीपणाचा अंश जाणवला असेल, की आपण आपला देश, आपले आई-वडील सोडून दूरदेशी जातो आहोत.
आता त्या वेदनेचंही कारण उरलेलं नाही. अगदी मूळ भारतीय नागरिकत्व ठेवून 16 निवडक देशांचं नागरिकत्व घेता येतं- त्यात ब्रिटनसहित युरोपमधले अनेक देश आहेत. तंत्रज्ञानानं जग इतकं जवळ आणलंय, जोडलंय की खरोखरच त्या तंत्रज्ञानाचा विधायक वापर करून आपल्याला जगाच्या पाठीवर सर्वत्र संपर्कात राहता येईल, भाषा शिकता येईल, जतन करता येईल, मराठी रेडिओ-टीव्ही स्टेशन्स चालवता येतील. (आपले अनेक मित्र खरोखरच असे उपक्रम करताहेत.) उत्तम मराठीचे अभ्यासक्रम तयार करून ते इंटरनेटवर, सॉफ्टवेअरवर किंवा “संडे’ स्कूल्स्’मधून शिकता-शिकवता येतील.
महाराष्ट्रातल्या शिक्षणसंस्थांशी जगभराच्या मराठी माणसाला जोडता येईल. जगभर गेलेला मराठी माणूस तिथल्या शिक्षणसंस्थांसहित “जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते’ भारताशी-महाराष्ट्राशी जोडू शकेल. जगभर त्यानं आपापल्या क्षेत्रात मिळवलेल्या तज्ज्ञतेचा उपयोग भारताला करून देता येईल. ज्यांच्याकडे तज्ज्ञतेबरोबरच आर्थिक भांडवलही आहे, ते नव्या गुंतवणुकीतून भारताच्या विकासाला, रोजगारनिर्मितीला हातभार लावू शकतील. जगभर जीवनानुभव घेतलेल्या मराठी माणसानं तो अनुभव, विस्तारलेली दृष्टी महाराष्ट्रामध्ये सांगितली तर मराठी मनाचीही “वैश्विक जाणीव’ व्यापक व्हायला मदत होईल.
उदाहरणार्थ, मराठी भाषा टिकण्याचं आव्हान केवळ युरोप-अमेरिकेमधल्या दुसऱ्या-तिसऱ्या पिढीच्या मराठी भाषिकांसमोरच आहे असं नाही, प्रत्यक्ष महाराष्ट्रातच मराठी भाषेसमोर आव्हान आहे-टिकण्याचं अस्तित्वाचंच आव्हान आहे. ज्यू समाजानं हाती शासन, सत्ता, भूमी काहीच नसताना, अत्यंत विपरीत परिस्थितीतही 2500 वर्षे आपली भाषा-संस्कृती, आपला धर्म जतन केला, साहित्य-व्यापार-विज्ञान क्षेत्रात अनमोल अशी नवी भर घातली. तर आजच्या जागतिक परिस्थितीत जेव्हा सर्व उणिवा-अडचणींसहित भारत देश उदयाला येतो आहे, तेव्हा जगभरचा मराठी माणूसही मराठी भाषा-संस्कृती निश्चितच जतन करू शकेल, जास्त समृद्ध करू शकेल.
आजही मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या लक्षात घेतली तर संपूर्ण जगात मराठीचं स्थान तेराव्या क्रमांकावर येतं. बारा कोटींहून जास्त लोकांची मातृभाषा मराठी आहे म्हणजे जपानच्या लोकसंख्येएवढी. जपानमधल्या प्रवासात मी पाहिलं की जपानी भाषा, संस्कृती न सोडता जपाननं सर्व आधुनिकीकरण आत्मसात केलं. पदवी, पदव्युतर, पीएच. डी.सकट पार मेडिकल, इंजिनिअरिंग. असं सर्व शिक्षण जपानी भाषेतून घेता येतं. जपानी पुस्तकांची आठ-आठ मजली भव्य दुकानं आहेत. मला वाटत राहतं की मराठीलाही हे शक्य आहे. एक भाषा म्हणून ती ताकद, ते व्याकरण, ती शब्दसंख्या आणि नवनवे शब्द, नव्या संज्ञा, नव्या संकल्पना स्वीकारण्याएवढी लवचिकता हे सर्व काही मराठी भाषेकडेही आहे.
म्हणजे मराठी भाषेचे “फंडामेंटल्स’ पक्के आहेत. अमेरिकेतल्या शिकागो आणि कोलंबिया विद्यापीठांत कॅनडातल्या क्विन्स युनिव्हर्सिटीत आणि मॉस्कोसहित काही ठिकाणी मराठी भाषेचे स्वतंत्र विभाग आहेत (भारतातच नाहीत). आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा स्वातंत्र्यासाठी भाषेची तलवार उपसणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणाले होते की, “इंग्रजी वाघिणीचं दूध’ पिऊन मराठी जास्त धष्टपुष्ट होईल. आता आपण स्वतंत्र आहोत, समृद्धही होत आहेत. नव्या आत्मविश्वासानं आपण जगभरच्या “इंग्रजी’च काय, सर्व वाघिणींचं दूध पिऊन, वैश्विक संस्कृतीतलं “उत्कट भव्य तेचि घेऊन’ “मिळमिळीत अवघेचि’ टाकून देऊन आपण अधिक समृद्ध होऊ शकतो, जगाला अधिक समृद्ध करू शकतो. कारण “अवघे विश्वचि माझे घर’ हीच मराठीपणाची मराठी भाषेची मूळ धारणा आहे.