सोमुर्डी गावच्या महिलांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना साकडे
वाघापूर – “साहेब, आमचे गाव खूप छोटे आहे, परंतु गावात एकी राहिली नाही. गावात दोन पार्ट्या असल्याने कोणताही सण, उत्सव असो. गावात हमखास भांडणे होणारच. त्यामुळे शांतता अजिबात राहिली नाही. आता गावची यात्रा तोंडावर आली आहे. दोन गटांनी वेगवेगळे तमाशे ठरविले आहेत. त्यासाठी ते हट्टाला पेटले आहेत. परंतु गावात तमाशा झाल्यास अख्या गावाचा तमाशा होईल.
लहान, लहान मुलेही दारू पिऊन भांडणे करीत आहेत, मारामाऱ्या करीत आहेत. गावात महिलांना सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे साहेब, “आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, काही झाले तरी चालेल पण गावच्या यात्रेत तमाशाचा कार्यक्रम होऊ देऊ नका, अशी कळकळीची विनंती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना सोमुर्डी गावच्या महिलांनी केली आहे.
पुरंदरच्या पश्चिम भागातील सोमुर्डीचे ग्रामदैवत असलेल्या काळभैरवनाथ देवाची दि. 11 आणि 12 रोजी यात्रा आहे. देवाची महापूजा, अभिषेक, आरती, पालखी मिरवणूक, छबिना आणि तमाशाचा कार्यक्रम पार पडतो. परंतु गावात दोन राजकीय गट आहेत. हरीनाम सप्ताह, प्रत्येक सण समारंभमध्ये भांडणे होतात. त्यामुळे संपूर्ण गाव या भांडणाला कंटाळले आहेत. कित्येक तरुणांवर पोलीस केसेस दाखल आहेत, गावात बेकायदेशीर दारूविक्री होत आहे. त्यामुळे भांडणे होण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यातच यावर्षी यात्रेला दोन्ही गटांच्या वतीने स्वतंत्र तमाशाचा कार्यक्रम ठरविला आहे. त्यासाठी तमाशा मालकांना काही रक्कम दिली असून ते कार्यक्रम पार पाडण्यासाठी हट्टाला पेटले आहेत. परंतु गावात भांडणे असताना पुन्हा दोन तमाशांवरून भांडणे होतील, या भीतीने महिलांचा तमाशाला कडाडून विरोध आहे. त्यांनी यात्रा कमिटी, सरपंच आणि पदाधिकारी यांना भेटून सांगितले. परंतु कोणीही त्यांचे ऐकून घेतले नाही.
त्यामुळे महिलांनी शेवटी निवेदन भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांना दिले आहे. यामध्ये त्यांनी गावची हकीकत सांगितली आहे. महिला आणि मुलीना कलहपूर्ण वातावरणात राहणे अवघड झाले आहे. यात्रेतील इतर सर्व कार्यक्रम होवू द्या. मात्र, तमाशा कोणत्याही परिस्थितीत होऊ देऊ नका, अशी हात जोडून कळकळीची विनंती केली आहे.
यावेळी सुनंदा बोऱ्हाडे, कल्पना बोऱ्हाडे, सरूबाई शेंडकर, सुरेखा बोऱ्हाडे, लाक्ष्मि ताई ताठेले, कौशल्या ताठेले, मंदा बोऱ्हाडे, आशा बोऱ्हाडे, कमल बोऱ्हाडे, जयश्री बोऱ्हाडे, आरती भोराडे, रेखाबाई बोऱ्हाडे, अनिता बोऱ्हाडे, हिराबाई शेंडकर, कुसुम बोऱ्हाडे, नंदा भोसले यांच्यासह सुमारे 30 ते 40 महिलांनी निवेदन दिले आहे. गोपनीय विभागाचे पोलीस नाईक भगीरथ घुले उपस्थित होते.
यात्रा शांतपणे पार पाडण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. हे पथक यात्रा काळात बेकायदेशीर कारवाई, बेकायदेशीर धंदे, दारूविक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करणार आहे. ज्या लोकांवर यापूर्वी गुन्हे दाखल असतील त्यांना नोटीसा पाठवून यात्रा काळात तडीपार केले जाईल. यात्रा कमिटीच्या सर्वांना नोटीसा देण्यात येतील. त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील. याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
– डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक.
गावाची शांतता महत्त्वाची आहे. सणानिमित्त गावात जर भांडणे, मारामाऱ्या होणार असतील तर तमाशा कोणत्याही परिस्थितीत होऊ दिले जाणार नाहीत. गावची तंटामुक्ती समिती, ग्रामपंचायत, पोलीस पाटील, यात्रा कमिटी आणि तमाशा भरविणारे आयोजक यांना एकत्रित बोलावून समजून सांगितले जाईल. आणि तरीही त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. वेळप्रसंगी यात्राकाळात त्यांना तडीपार
केले जाईल.
– अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर.