नवी दिल्ली – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघा महाराष्ट्र पेटला असताना शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली मुस्कटदाबी केल्याचा आरोप केला आहे. आम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला. पण सरकारने आम्हाला बोलूच दिले नाही, असे त्या म्हणाल्या आहेत.
चतुर्वेदी पुढे म्हणाल्या की, मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी शून्य प्रहराची नोटीस दिली होती. त्यासाठी एक बॅलेट असते. त्यात प्रश्नांची निवड केली जाते. त्यानंतर त्यांची यादी तयार करून ते संसदेत राज्यसभेत पाठवले जातात. या यादीत माझे व खासदार रजनी पाटील यांचे नाव होते.
आम्ही एकाच मुद्यावर बोलणार होतो. पण आम्हाला मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलण्याची संधीच देण्यात आली नाही. हा राज्यस्तरीय विषय असल्याचा दाखला देत आमची मुस्कटदाबी करण्यात आली.
राज्यसभेत एखादा मुद्दा मांडण्यासाठी मोठी प्रक्रिया पार करावी लागते. ही सर्व प्रक्रिया मी पार केली होती. सर्व नियम व कायदे पाळून हा मुद्दा बॅलेटमध्ये लिस्ट झाला होता. त्यात माझे नाव १२ व्या क्रमांकावर होते. तर रजनी पाटील १० व्या क्रमांकावर होत्या. पण प्रथम रजनी पाटील व त्यानंतर माझे नाव वगळण्यात आले, असे चतुर्वेदी म्हणाल्या.
वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज
मराठा आरक्षणाचा विषय गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे त्याचे आंदोलन उग्र झाल्याची बाब आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील मराठा तरूण आत्महत्या करत आहेत. याऊलट सरकार त्यांच्यावर लाठीचार्ज करत आहेत. मंत्रिमंडळातील मंत्रीच मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.