आंदोलनाबाबत लवकरच निर्णय
कोल्हापूर – मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजातील समन्वयकांसोबत चर्चा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोल्हापूरमधील भवानी मंडपात दोन दिवस ही संवादाची प्रक्रिया पार पडणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील तमाम नेते आणि समन्वयक या हितगुज कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. सर्वांनी एकत्रितपणे कायदेशीर बाबींचा विचार करून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणे गरजेचे असल्याचे संभाजीराजे छत्रपतींनी म्हटले.
मराठा आरक्षणासाठी दोन आंदोलन झाल्यावर संभाजीराजेंनी समाजातील सर्व घटकांना एका छत्राखाली आणण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा, ही केवळ आपल्या एकट्याची भूमिका नसून छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षि शाहू महाराज यांचीदेखील तीच भूमिका होती, असे ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे, हे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचं ध्येय आहे असे सांगत हे आंदोलन मॅनेज असल्याच्या चर्चांनाही त्यांनी उत्तर दिले. मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईल, असा सवाल करतानाच त्यांनी सर्वांना परिस्थितीचं भान बाळगण्याचाही सल्ला दिला.
ज्यावेळी मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय आला, त्यावेळी वातावरण तणावपूर्ण न करता शांततेची भूमिका आपण घेतली, असं ते म्हणाले. त्यावेळी सगळेजण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतले होते. मात्र मूळ मुद्द्यावर कुणीच बोलत नव्हतं.
आरक्षण मिळवण्यासाठी वातावरणात तणाव निर्माण करण्याची किंवा स्टंटबाजी करण्याची गरज नसून कायदेशीर मार्गाने आणि सनदशीर पद्धतीने हे काम पूर्णत्वाला नेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन दिवस मराठा समाजाच्या सर्व समन्वयकांसोबत चर्चा केल्यानंतर आपल्या आंदोलनाची पुढची दिशा संभाजीराजे छत्रपती जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यात छत्रपतींनी उभारलेला हा लढा पुढील काळात लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
आता संभाजीराजे काय भूमिका जाहीर करतात आणि मराठा आंदोलनाची पुढची दिशा कशी असणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. सध्या रिव्हिव्ह पिटीशन आणि क्युरेटिव्ह पिटीशन असे दोन कायदेशीर मार्ग उपलब्ध असल्याचं सांगत याव्यतिरिक्त इतर काही मार्गांचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.