Lok Sabha Election 2024 | देशात सध्या हुकूमशाहीसारखी परिस्थिती असून साम, दाम, दंड, भेद याचा वापर करुन केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन पक्ष व कुटुंबे फोडण्याचे प्रकार सुरु आहेत. भाजपच्या दडपशाही आणि हुकुमशाही कारभारात अनेकांनी जेल टाळण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. देशात व राज्यात भाजप दाखवत आहे ते चित्र वास्तव नसून इंडिया आघाडीला चांगले यश मिळेल. इंडिया आघाडीत कसलेही मतभेद नसल्याचे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.
सातारा लाेकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, दीपक पवार, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, देशात सध्या खूप विदारक परिस्थिती आहे. केजरीवाल यांच्या अटकेचे जगभर पडसाद उमटले आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांवर दहशत निर्माण करण्यात येत आहे. या दहशतील बळी पडत काही जणांनी जेल टाळण्यासाठी भाजपची वाट धरली असून काहींनी त्यांच्या सुरात सूर मिळवत लाेकशाहीला तिलांजली दिली आहे. भाजपच्या हुकूमशाहीला रोखण्यासाठी देशभर उठाव होत असून या निवडणुकीत भाजपला रोखण्याची गरज आहे.
सातारा मतदारसंघासाठी खा. श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा लढावे अशी माझ्यासह अनेकांची इच्छा होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते लढणार नाहीत. खडतर परिस्थितीत श्रीनिवास यांची सामना करण्याची तयारी होती. मात्र, वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवणे योग्य नसल्याचे आमचे मत बनले आहे. या निवडणुकीत सातारा लोकसभेसाठी माझं नाव काही लोकांनी सुचवलंय. पण, राज्याची जबाबदारी माझ्यावर असल्याने मला अधिक लक्ष द्यावं लागतं आहे. तुमची इच्छा असली तरी ती पूर्ण करता येणार नाही, असे सांगत श्री. पवार यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारीस नकार दिल्याने आता आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, सुनील माने, सत्यजित पाटणकर यांची नावे पक्षाच्या राज्याच्या निवड समितीकडे पाठवण्यात येणार असून पार्लमेंटरी बोर्डाकडून योग्य आणि सक्षम उमेदवाराची घोषणा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेसह (उद्धव ठाकरे) व अन्य पक्ष संघटनांनी एकत्र येत रान उठवले आहे. सातारा जिल्ह्यातील जनता आमच्या विचारांबरोबर असून आम्ही दुसऱ्या कोणाचा विचार करत नाही. जनता आमच्याबरोबर असल्याने आगामी निवडणुकीत वेगळे चित्र पाहावयास मिळेल. आ. बाळासाहेब पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आग्रही असले तरी ते लढतील की नाही याबाबत शरद पवार म्हणाले, आम्ही सांगू तसे बाळासाहेब ऐकतील. सातारा जिल्ह्यातील मतदार सूज्ञ असून ते योग्य निर्णय घेतील. राज्यात, जिल्ह्यात महाविकास आघाडीत नाराजी नसून तसा अपप्रचार विनाकारण करण्यात येत आहे. वंचित आघाडीने आमच्याबरोबर यावे, अशी भूमिका शरद पवार यांनी यावेळी मांडली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत शरद पवार यांनी प्रशासनाने टंचाई निवारणासाठी पुढाकार घेऊन दुष्काळग्रस्तांना आधार द्यावा, अशी मागणी केली.