पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापालिकेत सत्ता असताना या शहराचा नियोजन बध्द पध्दतीने विकास करण्यात आला. सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून या शहराची ओळख, लौकिक होता तो परत मिळवायचा आहे. त्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. वेगवेगळ्या तक्रारी असतात, निविदा मॅनेज करण्याचा, रिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. करदात्यांचा टॅक्स रूपाने आलेला पैसा चुकीच्या पध्दतीने खर्च केल्याच्या अलीकडे बरीच उदाहरणे पहायला मिळतात. पिंपरी-चिंचवड शहर विकासाचे रोल मॉडेल म्हणून नाव घेतले जाते. मात्र, गेल्या काही दिवसात शहराच्या विकासाची बिघडलेली घडी पुन्हा बसवायची असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.20) केले.
दरम्यान, महापालिकेत गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपची सत्ता होती. तसेच शहरात दोन आमदार भाजपचे असून महापालिकेत देखील त्यांचे वर्चस्व आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या काळात विकासाची घडी बिघडल्याची टीका केली. यामुळे त्यांनी शहर भाजपवर निशाना साधल्याचे बोलले जात आहे. परंतु यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचेही कौतुक करत आपली नाराजी केवळ स्थानिक पातळीवर असल्याचे दाखवून दिले आहे.
आकुर्डी, प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सव आणि गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. आमदार अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, नाना काटे, राहूल भोसले, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, विशाल काळभोर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
अधून-मधून येतात…रोहित पवारांना टोला
कै. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर शहरात मी लक्ष घातले. शहराच्या विकासासाठी कठोर निर्णय घेतले, त्यामुळेच आज शहरात प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, शाळा, स्वच्छ पाणी नागरिकांना देण्यासाठी प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवडवर माझे विशेष प्रेम असल्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदला. मात्र, आता शहरात अधून-मधून काही जण येतात. वेगळ्या प्रकारचे वातावरण करण्याचा प्रयत्न करतात, असे टोला उपमुख्यमंत्री पवार यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेत लगावला.
… तर डीजेविरोधात कडक कायदा
दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे साथीच्या आजारांसह विविध नवनवीन आजार येत आहेत. सर्वांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला करणे गरजेचे आहे. सण, उत्सव, मिरवणुकांमध्ये डीजेचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. यामुळे अनेकांना कान बहिरे होणे, ह्दयविकारचा त्रास होऊ लागला आहे. दुसरीकडे लेझर लाइटमुळे अनेकांच्या दृष्टीवर परिणाम होत असल्याचे तज्ञ सांगत आहेत. त्यामुळे डीजे, लेझर लाइटविरहित सण, उत्सव साजरे करावेत. याचे पालन केल्यास कठोर कायदा करण्याचा विचार केला जाईल, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.