फुलांना घाऊक बाजारभाव नसताना स्थानिक बाजारात मात्र कडाडले
पुणे – नवरात्रोत्सव सुरू आहे. फुलांना मागणी वाढली आहे. परंतु, एकीकडे घाऊक बाजारात कमी भाव मिळत असताना किरकोळ बाजारात मात्र फुलांची विक्री चढ्या भावाने केली जात आहे. सणसुदीच्या नावाखाली फुलांची किरकोळ विक्री चढ्याभावाने केली जात आहे. शेतकऱ्यांना कमी भाव तसेच सर्वसामान्य नागरिकांना चढ्याभावाने फुलांची खरेदी करावी लागत आहे. सणवाराच्या नावाखाली विक्रेत्यांकडून मार्केटींग करून फुल चढ्याभावात विकली जात आहेत.
नवरात्रोत्सवाच्या सुरूवातीच्या दोन दिवसांत फुलांची मोठी आवक झाली. घाऊक बाजारात झेंडूला 10 ते 20 रुपये किलो, तर शेवंतीला 100 रुपये भाव मिळत होता. मात्र, अपेक्षित भाव न मिळाल्याने फुलांची आवक कमी झाली आहे. परिणामी, भावात काहीशी वाढ झाली आहे.
मंगळवारी (दि. 24) दसरा आहे. रविवारी आणि सोमवारी फुलांची मोठी आवक होणार आहे. दरम्यान, किरकोळ बाजारात मात्र, फुलांची चढ्या भावाने विक्री होत आहे. किलोला 180 ते 300 रुपये भाव मिळत आहे.
यामुळे होतेय जास्त आवक
“यंदा पाऊस कमी झाला आहे. पाऊस कमी झाल्यास फुलांचे उत्पादन जास्त होत असते. त्यात यंदा लागवडही जास्त झाली आहे. त्यामुळे फुले विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात मार्केट यार्डात बाजारात दाखल होत आहेत. पुणे, सोलापूर, सातारा जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागांतून आणि कर्नाटक येथील शेतकरी फुले विक्रीस पाठवत आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.’
मागील दोन दिवसांत फुलांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात झेंडूच्या भावात दुप्पट वाढ झाली आहे. आता, झेंडूला किलोला 40 रुपये भाव मिळत आहे. शेवंतीचे भावही वाढले आहेत. किलोला 140 रुपये भाव मिळत आहेत. किरकोळ विक्रेते यापेक्षाही चढ्याभावाने विक्री करीत आहेत.
– अरुण वीर,
अध्यक्ष, अखिल फुलबाजार आडते असोसिएशन