सातारा, (प्रतिनिधी) – आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने माण पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी तब्बल 23 कोटींचा निधी मिळाला आहे. तालुक्याच्या मिनी मंत्रालयाची इमारत सर्वार्थाने सुसज्ज, देखणी आणि दहिवडीच्या वैभवात भर घालणारी असावी, म्हणून ते जातीने लक्ष देत आहेत.
जयाभाऊ जो शब्द देतात, तो पूर्ण करून दाखवतात. या भागातील पाणी योजना पूर्ण करण्यासाठी त्यांनी ‘न भूतो न भविष्यति’ प्रयत्न केल्याचे गौरवोद्गार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काढले.
पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. आ. जयकुमार गोरे, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे, अर्जुन काळे, संदीप पोळ, भाजयुमो जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, नगराध्यक्ष मनीषा काळे, अर्चना सावंत, शिवाजीराव शिंदे, गणेश सत्रे, अतुल जाधव, सोमनाथ भोसले, धनाजी जाधव, बाबासाहेब हुलगे, हरिभाऊ जगदाळे, सिद्धार्थ गुंडगे आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, पंचायत समितीच्या सध्याच्या इमारतीत अनेक गैरसोयी असल्याने, नूतन अद्ययावत इमारत उभारण्याचा संकल्प केला होता. तहसील कार्यालयाची उर्वरित इमारतही लवकरच उभारणार आहे. दहिवडीत नवीन पोलीस ठाणे आणि पोलिस हाऊसिंग सोसायटीही बांधण्यात येणार आहे.
नगरपंचायतीच्या इमारतीसाठीही निधी उपलब्ध केला होता. ऐन दुष्काळात उरमोडी आणि जिहे-कठापूरचे पाणी तालुक्यात आले आहे. वंचित 42 गावांना टेंभू योजनेतून अडीच टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तर माणसाठी जिहे-कठापूर वाढीव योजना लवकरच पूर्ण होत आहे. उर्वरित 27 गावांचे सर्वेक्षण सुरू होत आहे. औंधसह 22 गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावला आहे.
मतदारसंघाची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. मोठी औद्योगिक वसाहत उभी राहून, 25 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. मतदारसंघात दीड हजार विकासकामे मंजूर झाली आहेत. माण-खटावचा विकास वेगाने होत असल्याने विरोधक सैरभर झाले आहेत. निवडणुका आल्याने हंगामी गडी फोकसमध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहेत.
जनतेला साडेचार वर्षे वार्यावर सोडणारे स्वयंघोषित नेते आता रोजगार मेळाव्यांचे नाटक करत आहेत. पूर्वी आपले पाणी पळवले जायचे आणि लाचार नेते गप्प बसायचे. मात्र, आता आपल्या हक्काचे पाणी मतदारसंघात आणण्यात मला यश आले आहे. आता एक थेंबही पाणी कुणी पळवून नेऊ शकत नाही. विनोद येवले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.