पिंपरी (प्रतिनिधी) – मराठा आरक्षण आंदोलनाने लोकसभा निवडणुकीत कुठेही उमेदवार दिलेला नाही. आम्ही कोणालाही उभे केलेले नाही अन् पाठिंबाही दिलेला नाही. मराठा आंदोलनाचा उमेदवार कुठे उभा असल्यास, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
अशा उमेदवारांनी माझे व आंदोलनाचे नावही वापरू नका, असे सांगत खूप दिवसांनी माझा समाज एकत्र आला आहे. त्यामुळे कमी मते मिळाली तर समाज हरला असे होईल. म्हणून अर्ज भरणार्यानेदेखील विचार करावा, असा सल्ला देत, निवडणुकीत पाडणारे बना त्याच्यादेखील मोठा विजय आहे, असे आवाहन मराठा आरक्षणाचे समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी केले.
पिंपरी-चिंचवड,रूपीनगर येथील एका धार्मिक कार्यक्रमाला रविवारी (दि.7) जरांगे पाटील उपस्थित होते. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमाशी संवाद साधत त्यांनी आपली व मराठा आरक्षण आंदोलनाची भुमिका स्पष्ट केली.
यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाच्या मनात खदखद असून यावेळी समाज 100 टक्के रोष व्यक्त करणार आहे. राज्य सरकारने मराठ्यांच्या पोरांना धोका दिला. आरक्षण देऊ म्हणाले पण दिले नाही. याला मुख्यमंत्री व गृहमंत्रीसुद्धा जबाबदार आहेत. मराठा आणि कुणबी एकच आहे, याच्या आधारासाठी 57 लाख नोंदी मिळाल्या आहेत. मात्र, अद्यापही मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही.
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भुमिकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे राज्याचे पालकत्व असते. आंदोलक या नात्याने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, ते बरोबर केले. कायद्यातील बदलासाठी अधिसूचनाच गरजेची. मात्र ज्या कालावधीत अधिसूचनेची त्याची अंमलबजावणी करायला उशिर केला तिथेच धोका झाला. त्यामुळे मराठा आरक्षण मिळू शकले नाही. तसेच हा प्रश्न केंद्राशी संबंधित नसून तो राज्याशी संबंधित आहे, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील भूमिकेबाबत ते म्हणाले की, माझा राजकीय मार्ग नसल्याने मी त्यापासून अलिप्त आहे. मी राज्यात कोणताही अपक्ष उमेदवार दिलेला नाही आणि कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. फक्त एकच आहे, समाजाने ही निवडणूक हातात घेऊन ज्याला पाडायचे आहे, त्याला पाडायचेच आहे.
समाज हुशार आहे. शेवटी माझाही नाईलाज आहे. फक्त त्याला वेळ लागतोय, कोणतीही गोष्ट करताना ती विचारपूर्वक करावी लागते. महाविकास आघाडी व महायुतीने या दोघांनीही आम्हाला काहीही दिलेले नाही. सगेसोयर्यांच्या बाजूची अंमलबजावणी करणार आहे, त्याला मतदान करा. मात्र त्यावेळी आपल्या आई बहिणींवरील मारहाणीचे वळ विसरू नकात, असेही ते म्हणाले.
गृहमंत्र्यांना पुढे जड जाणार
मराठा आरक्षण आंदोलनाच्या सात महिन्यांच्या वाटचालीबाबत ते म्हणाले की, गृहमंत्र्यांनी खोटे गुन्हे दाखल करायचे, अमिष दाखवून लोक फोडायचे काम सुरु आहे. विनाकारण महिलांवर गुन्हे दाखल करायचे, हे त्यांना पुढे जड जाणार आहे, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
6 जूनपर्यंत आरक्षण न दिल्यास राज्य काबीज करू
सात महिन्यांत मी गृहमंत्र्यांचा एकही डाव यशस्वी होऊ दिलेला नाही. त्यांचा डाव यशस्वी झाला असता, तर मी समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असे झाले असते. वेळ कमी होती, त्यामुळे ते शक्य झाले नाही.
जर त्यांनी 6 जूनपर्यंत मराठा आरक्षण न दिल्यास विधानसभेला संपूर्ण महाराष्ट्र काबीज करणार आहे. आमचा प्रश्न केंद्राशी संबंधित नसून, तो राज्याशी संबंधित आहे. आता गोरगरीबांनीच देणारे बनायचे आहे.
आंबेडकर, आमची मने एकच
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर संध्या माझ्या संपर्कात नाहीत. मात्र आमची मने एकच आहेत. दोन मनं होऊ शकणार नाहीत. अंतरवाली सरटीत त्यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान त्त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्यामध्ये त्यांच्या लक्षात आले की माझा मार्ग राजकीय नव्हे. त्यानंतर ते माझ्या संपर्कात नाहीत, असे जरांगे म्हणाले.