Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमंलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. परंतु मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक रविवारी आंदोलनास्थळी दाखल झाले होते. मात्र, जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी गेल्या महिन्यात मोठ्या संख्येने मराठा बांधवांसोबत मुंबईत धडक दिली होती. मात्र, वाशीवरच त्यांचे आंदोलन थांबवत सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला होता. सोबतच पंधरा दिवसांत या अध्यादेशाची अंमलबजावणी होण्याचे देखील आश्वासन दिले होते. परंतु, पंधरा दिवस उलटूनही या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये चौथ्यांदा उपोषण सुरू केले आहे.
मुंबईत मराठा आंदोलक धडकण्याआधीच राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले होते. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश निघाल्यानंतर जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाने कुणबी प्रमाणत्र देताना सगेसोयऱ्यांचाही समावेश करावा, त्याबाबतचा कायदा मंजूर करावा. मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे अधिवेशन त्वरित घ्यावे, आरक्षण अधिसूचना व मसुद्याची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत.