Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. मागील पाच दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे.
दोन दिवसांपासून जरांगे यांचे हात थरथरतायात, बोलण्यास देखील त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. त्यांनी सलाईनही लावण्यास नकार दिला आहे.
मनोज जरांगे यांना सर्वजण पाणी तरी प्या असा आग्रह करत आहेत. पण जरांगे कुणाचेही ऐकेनात. कुणालाही प्रतिसाद देत नाहीत. आधी अध्यादेशाची अंमलबजावणी करा, मगच पाणी घेतो असं त्यांनी म्हटलंय. ( Manoj Jarange Patil )
जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत पाण्याच्या थेंबालाही हात लावणार नाही असं जरांगे यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वांनाच काळजी वाटू लागली आहे. काल जरांगे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली होती. झोपेतच त्यांना सलाईन लावली होती. पण जाग येताच त्यांनी सलाईन काढून टाकली.
दरम्यान, अश्यातच मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना उपचार घेण्यास अडचण काय? असा सवाल केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.
यावेळी ‘मनोज जरांगे यांना औषोधोपचार घ्यायला सांगा…’, अशा सूचना मुंबई हायकोर्टाने दिल्या आहेत. फक्त सलाईन लावणं म्हणजे उपचार घेणं होत नाही, असंही हायकोर्टाने म्हटलं आहे. जरांगेंना उपचार घेण्याच्या सूचना कळवा, असे निर्देश हायकोर्टाने जरांगेंच्या वकिलांना दिले आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे यांना उपचार घेणं बंधनकारक आहे.
कोर्टात काय-काय घडलं? ( Manoj Jarange Patil )
मनोज जरांगे यांच्या उपचारासाठी 2 डॉक्टर आहेत. जरांगेंना काल दोनवेळा सलाईन लावण्यात आली, असा युक्तिवाद जरांगेंच्या वकिलांनी केला. यावेळी महाधिवक्तांनी मनोज जरांगे डॉक्टरांना सहकार्य करत नाहीत, अशी माहिती हायकोर्टात दिली.
यावर हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलं. उपोषणस्थळी डॉक्टर असणं, सलाईन घेणं म्हणजे उपचार घेणं असं होत नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं. उपचार घेण्यात जरांगेंना अडचण काय? असा सवालही हायकोर्टाने केला.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील यावेळी युक्तिवाद केला. जरांगेंच्या उपोषणाचा परिणाम म्हणून काल अनेक ठिकाणी बसची तोडफोड झाली, असं सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात सांगितलं. यानंतर हायकोर्टाने महत्त्वाचे निर्देश दिले. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. ( Manoj Jarange Patil )