Manoj Jarange Patil : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. विविध ठिकाणी त्यांच्या सभेचे आयोजन केले जात आहे. सोमवारी धाराशिवमध्ये त्यांची जाहीर सभा होती. मात्र सभेत बोलत असतानाच अचानक त्यांची तब्येत खालवली. भाषण करताना अचानक ते खाली बसले त्यामुळे एकच गोंधळ उडाला. धाराशिव येथील सभेवेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने भाषण करतानाच अचानक जरांगे पाटील खाली बसले आणि बसूनच त्यांनी सभेला संबोधित केले.
डॉक्टर सभास्थळी दाखल होताच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना व्यासपीठावरच तपासले. यावेळी डॉक्टर यांनी मनोज जरांगे पाटील यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र भरसभेत प्रकृती खालावली तरी जरांगे पाटील यांनी व्यासपीठ सोडले नाही. उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करत समाजाला जागरुक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर सभा आटोपून जाताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं बीडच्या अंबेजोगाई येथील थोरात रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. धारशिवनंतर मनोज जरंगे पाटील यांची बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा या ठिकाणी काल संध्याकाळी सात वाजता जाहीर सभा झाली.
परंतु बीडच्या अंबेजोगाईच्या सभेतही त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना अंबेजोगाईच्या थोरात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. जरांगे पाटील यांच्यावर वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. अशक्तपणा आला आहे. सातत्याने तणाव घेऊन प्रवास करणे यातून त्यांचे तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे. सुगर प्रमाण सातत्याने कमी होत गेली तर त्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो. मनोज जरांगे पाटील यांनी ५-६ दिवस आराम केला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला आहे.
तब्येत बिघडली असताना देखील नियोजित सभांना उपस्थित राहण्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.