नवी दिल्ली – चीनच्या सीमेवरील स्थितीच्या संबंधात लोकसभेत चर्चा करावी या मागणीसाठी काँग्रेसचे लोकसभा खासदार मनीष तिवारी यांनी मंगळवारी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला.
श्री आनंदपूर साहिब मतदारसंघातील खासदार तिवारी यांनी शून्य तास, प्रश्नोत्तराचा तास आणि दिवसाचे इतर कामकाज स्थगित करण्याची मागणी केली.
२०१९ पासून, भारत आणि चीनमध्ये सतत सीमेवर चकमकी होत आहेत. या तातडीच्या मुद्द्यावर चर्चेसाठी विरोधकांनी केलेले प्रत्येक प्रयत्न सरकारने हाणून पाडले आहेत.
त्यामुळे मी विनंती करतो की भारत-चीन सीमा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करून चर्चा करण्यात यावी असे तिवारी यांनी लोकसभेच्या महासचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. चीन सीमेवर चीनी सैन्याने केलेल्या अतिक्रमणाविषयी तिवारी सातत्याने आवाज उठवत आहेत.