नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवत भाजप आणि एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपने विजयाची घोडदौड करत 300 चा आकडा पार केला आहे. तर एनडीए 350 जागांपर्यंत पोहोचली आहे. कॉंग्रेसला फक्त 50 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या मनेका गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. राजकारण हा पोरखेळ नाही, त्याकडे गंभीरतेने बघा, असा टोला मनेका यांनी लगावला आहे.
राहुल गांधी यांचा अमेठीतच पराभव झाला. त्यांच्या या पराभवावर मेनकानी हा टोला लगावला आहे. या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर राहुल गांधी यांनी या क्षेत्राचा कोणताही विकास केलेला नाही. त्यामुळे जनतेत त्यांच्याविरोधात रोष होता. तो रोष या निवडणुकीतून जनतेने व्यक्त केला आहे. तसेच या निवडणूक प्रचारात त्यांनी कोणताही मुद्दा उपस्थित केला नव्हता. गाडीत बसून फक्त हात हलवत जनतेला अभिवादन करून कोणतीही निवडणूक जिंकता येत नाही, असा सल्लाही मनेका यांनी दिला आहे.
राहुल यांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी गांभीर्याने करण्याची गरज आहे. योग्य प्रकारे अभ्यास करूनच त्यांनी राजकारण करावे, राजकारण हे गंभीर असून पोरखेळ नाही. त्यामुळे राजकारणाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.