नवी दिल्ली – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. तेलंगणा राज्य वगळता अन्यत्र कॉंग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीतील कथित घटक पक्षांनी कॉंग्रेसला ( Congress ) डोळे दाखवण्यास सुरूवात केली आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी ( Mamata Banarjee ) यात अग्रभागी असून त्यांनी कॉंग्रेसला उद्देशून खोचक टिप्पणी केली आहे.
ममता म्हणाल्या की प. बंगालमध्ये कॉंग्रेसचे केवळ दोनच खासदार आहेत. मात्र तरीही कॉंग्रेसशी चर्चा करण्यास त्या तयार आहेत. मांजराच्या गळ्यात कोणीतरी घंटा बांधणे गरजेचे आहे.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा चेहरा कोण असेल असेही ममतांना यावेळी विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निर्णय घेतला जाईल.
बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस, डावे पक्ष आणि कॉंग्रेस यांची आघाडी शक्य आहे. तसेच महुओ मोईत्रा यांना माझा पूर्ण पाठिंबा असून त्यांना उमेदवारी देण्याबाबत आमचा संसदीय पक्ष निर्णय घेईल असे मत देखील यावेळी ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.