Nitin Gadkari – भारतात चालकरहित वाहनांना कोणत्याही किमतीत परवानगी दिली जाणार नाही याचा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पुनरूच्चार केला आहे. देशात जर अशी स्वयंचलित वाहने आणली गेली तर तब्बल ८० लाख लोक बेरोजगार होतील असे त्यांनी म्हटले आहे.
आयआयएम नागपूरद्वारा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, भारतात चालक नसलेल्या वाहनांना आपण कधीच परवानगी देणार नाही असे मी अमेरिकेत असतानाही म्हटले होते. त्याचे कारण आमच्या देशात मोठ्या संख्येन लोक वाहनचालक अर्थात ड्रायव्हर म्हणून काम करतात.
जर चालकविना चालणाऱ्या कार आणल्या गेल्या तर या सगळ्या लोकांची नोकरी चालली जाईल. केवळ कमी लोकसंख्या असणाऱ्या देशांसाठी अशी वाहने उपयुक्त आहेत. भारतात अशा वाहनांमुळे जर ७० ते ८० लाख लोक बेरोजगार झाले तर तो वेगळाच मुद्दा होऊन बसेल.
दरम्यान, यापूर्वीही दोन वेळा गडकरी यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. जुलै २०१७ आणि डिसेंबर २०१९ मध्ये त्यांनी अशा कारना जाहीर विरोध व्यक्त केला होता. नागपूरच्या या कार्यक्रमात त्यांनी इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या संदर्भातही भाष्य केले.
ते म्हणाले की आम्ही टेस्लाचे स्वागत करतो आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा त्यांचा कारखाना भारतात सुरू होऊ शकतो. मात्र त्यांनी चीनमध्ये वाहनांची विक्री करायची आणि त्यांची भारतात विक्री करायची हे शक्य नाही. त्यांनी भारतातच वाहनांची निर्मिती करावी अशी आमची भूमिका आहे.