नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नैराश्यातून स्वबळावर लढण्याची घोषणा केली. ती घोषणा इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी मृत्यूघंटा वाजवणारी आहे, अशी खिल्ली भाजपकडून उडवण्यात आली. बंगालमध्ये स्वबळावर लढण्याच्या ममता यांच्या घोषणेवर भाजपचे नेते अमित मालवीय यांनी प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणुकीनंतरही अस्तित्व राखण्याच्या उद्देशातून ममतांनी तसा निर्णय घेतलेला दिसतो. इंडियाचा चेहरा बनण्याची त्यांची इच्छा होती. पण, कुणीच त्यांचे नाव पुढे केले नाही. राष्ट्रीय प्रतिमा बनवण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक दिल्ली दौऱ्यांचा काही उपयोग झाला नाही. आता निराशेतून त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी म्हटले.
भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनीही इंडियाला लक्ष्य केले. ती आघाडी अनैसर्गिक आहे. बंगालमध्ये कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस आणि डावे पक्ष एकमेकांशी झुंजत असल्याने ती आघाडी राजकीयदृष्ट्या व्यवहार्य नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध असले तरी जमिनीस्तरावर त्यापेक्षा खूप वेगळी स्थिती आहे. त्या पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकत आहेत,असा दावा त्यांनी केला.