सातारा – कण्हेर धरण परिसरात कुटुंबीयांसमवेत फिरायला गेलेल्या मामा व भाचीचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
निकिता अजय पुनदीर (वय 32) व उदय जगन्नाथ पवार (वय 45, रा. वेळे कामथी, सध्या रा. मुंबई) असे धरणात बुडून मृत्यू झालेल्या मामा भाचीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेळे कामथी (ता. सातारा) येथील दत्तजयंतीच्या यात्रेनिमित्त मामा भाची कुटुंबीयांसमवेत वेळे कामथी येथे आले होते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास पवार आणि पुनदीर कुटुंबीय कण्हेर धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक निकितीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी मामा उदय पवार यांनी धरणात उडी घेतली. परंतु, निकिताने मामाला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. कुटुंबाच्या डोळ्यादेखत मामा-भाची बुडाल्याने कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड केली.
परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. दोघेही पाण्यात दिसेनासे झाले. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर वेळे कामथी येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी तत्काळ पोहोचले. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि परिसरातील युवकांनी धरणात उतरून शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी दोघांचेही मृतदेह मिठी मारलेल्या अवस्थेत दिसून आले. दोन्ही मृतदेह वर काढताना निकिताचा मृतदेह अचानक निसटला. मात्र, मामाचा मृतदेह बाहेर काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्सला यश आले. निकिता मृतदेह खोल पाण्यात सटकल्याने शोध कार्यात अडथळे येत होते. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरूच होती. दरम्यान, निकिता पुनदीर ही उत्तराखंडमधील असून ती सध्या मुंबई येथे स्थायिक झाली होती, असे पोलिसांनी सांगितले.