पुणे- आरोग्याबाबतची जाणीव निर्माण करण्यासाठी चित्रपट हे माध्यम प्रभावी ठरेल, असे मत राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर सुकथनकर यांनी व्यक्त केले.
समाजप्रबोधनासाठी चित्रपट हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाच्या मदतीने आपण एकाचवेळी अनेकांपर्यंत पोहचू शकतो. धकाधकीच्या जीवनात आरोग्यावर आधारीत काही चित्रपट आपल्याला स्वत:वर लक्ष केंद्रीत करण्यासाठी भाग पाडते. या प्रकारच्या कलाकृतीची समाजाला गरज आहे. यांसारख्या आरोग्य चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं अनेक आजारांवर शाॅर्ट फिल्म तयार करण्यात आल्या आणि त्याच पद्धतीने अनेक विषयही हाताळले गेले. समाजाला या पद्धतीच्या कलाकृतीची गरज आहे, असेही ते म्हणाले.
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य फिल्म फेस्टीव्हल 2020 आयोजित करण्यात आला होता. व्हिडीओ स्पाॅट आणि डाॅक्युमेंटरी अशा 144 फिल्म परिक्षणासाठी आल्या होत्या. त्यात 16 फिल्मचं स्क्रिनिंग करण्यात आलं. यात कॅन्सर, टी.बी, मासिक पाळी अशा अनेक विषयांवर फिल्म दाखवल्या गेल्या.
डाॅक्युमेंटरी विभागात अनुपम बर्वे यांच्या कब कब जब जब यांचा पहिला क्रमांक तर व्हिडीओ स्पाॅट विभागात कुणाल वैरागे यांच्या सिंगल मिनीट फनने पहिला क्रमांक पटकावला.