वाघापूर, (वार्ताहर) – पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याची मागणी असूनही माळशिरस गावाचे पाणी बंद केल्याने गावाला पिण्याचे पाणी नसल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला .
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी न मिळाल्याने माळशिरस ग्रामस्थांनी सोमवारी (दि. 1) पुरंदर उपसा योजनेच्या सासवड येथील कार्यालयात आंदोलन केले. तर शेतकरी प्रवीण कामठे यांनी पुरंदर उपसा योजनेच्या पाण्यासाठी कार्यालयात आंगावर डीझेल ओतून निषेध व्यक्त केला. ग्रामस्थ व पोलिसांनी वेळीस आवरल्याने पुढील अनर्थ टळला.
तरीही पाणी न मिळाल्याने माळशिरस ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 2) तातडीची गावबैठक बोलवली. यात जोपर्यंत पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मिळत नाही तोपर्यंत आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून निषेध नोंदवला. त्याचप्रमाणे कोणत्याही पुढार्यांनी गावात येऊ नये, असाही निर्णय घेण्यात आला.
तरीही पाणी न मिळाल्यास आंदोलनाची पुढची दिशा म्हणजे माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने जेजुरी पोलीस ठाण्याला निवेदन देऊन वाघापूर-चौफुला येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा गावबैठकीत एकमुखी निर्णय घेण्यात आला.
यावेळी माळशिरसचे उपसरपंच अशोक यादव, माळशिरस सोसायटीचे अध्यक्ष सदाशिव डोंबाळे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष माऊली यादव, ग्रामपंचायत सदस्य शरद यादव, सुखदेव मराठे, दीपक यादव, नवनाथ यादव, दादा यादव, संतोष यादव यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.