नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात कपात करण्याचा निर्णय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांशी जोडत कॉंग्रेस पक्षाकडून सरकारवर टीका करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर यमक जुळवत सरकारवर निशाणा साधला आहे.
जब वोट लगे घटने…तो चुनावी तोहफे लगे बटने अशा ओळींचा आधार घेत खर्गे यांनी सरकारला लक्ष्य केले. जनतेचे कष्टाचे पैसे लूटणारे मोदी सरकार आता माता भगिनिंच्या प्रति बेगडी सदभावना दर्शविण्याचा प्रयत्न करते आहे. गेली साडेनऊ वर्षे 400 रूपयांचे सिलिंडर 1100 रूपयांपर्यंत नेऊन त्यांनी सर्वसामान्य माणसांचे आयुष्य बरबाद केले. त्यावेळी त्यांना कोणती प्रेमाची भेट आठवली नाही. मात्र भारतीय जनता पार्टीच्या सरकारने एक गोष्ट ध्यानात घ्यावी की साडेनऊ वर्षे लोकांना त्रास दिल्यावर आता केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतदारांच्या हातात लॉलीपॉप देऊन भागणार नाही. त्यांची दहा वर्षातील पापे धुतली जाणार नाहीत असे टीकास्त्र खर्गे यांनी सोडले.
लोकांना भाजपने लादलेल्या कंबर तोडणाऱ्या महागाईच्या सामना करता यावा यासाठी कॉंग्रेस पक्ष अगोदरच आमचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये 500 रूपयांत लोकांना गॅस सिलिंडर देणार आहे. राजस्थानात तर हा निर्णय लागूही करण्यात आला आहे.
जनतेच्या मनात ही जी नाराजी सरकारच्या विरोधात आहे, ती 200 रूपयांच्या सबसीडीमुळे कमी होणार नाही हे मोदी सरकारने लक्षात ठेवावे. मोदींना इंडिया या विरोधी पक्षांच्या महाआघाडीची भीती वाटते आहे ते चांगलेच आहे. आता महागाईला कायमची मात देण्यासाठी 2024 मध्ये मोदी सरकारला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा एकमात्र पर्याय शिल्लक राहीला आहे, असेही खर्गे म्हणाले.