मुंबई – राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत. फक्त सनसनाटी निर्माण करून मूळ विषयापासून विचलित करण्याच्या उद्देशाने ते तथ्यहीन आरोप करत आहेत. सीबीआय, ईडी, एनआयए, एनसीबी या देशातील उत्तम तपास यंत्रणा आहेत. भाजपला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहे. पण नवाब मलिक यांना या तपास यंत्रणापेक्षा जास्त ज्ञान असेल व कायद्याची माहिती असेल तर त्यांनी आपल्याकडील माहिती कायद्याच्या चौकटीत सांगावी, असा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज लगावला.
एनसीबीने ताब्यात घेतलेल्या 11 जणांमध्ये ऋषभ सचदेव, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला या तिघांना सोडण्यात आले. या तिघांना का सोडण्यात आले?, रिषभ सचदेव हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचे नातेवाईक आहेत, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना या प्रकरणामध्ये जर एनसीबीने कोणाला सोडल्याचा मलिक यांचा दावा असेल तर तो तपासून पाहिला पाहिजे, कारण कायदा हा सर्वांना समान आहे. मग तो कोणीही असो वा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो. पण केवळ बिनबुडाचे आरोप करु नये.
राज्याचे गृहमंत्री तुमचेच आहेत, त्यामुळे मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिस यांच्या मार्फत संबंधितांचे मोबाईल कॉल तपासणं, अन्य माहिती घेण हे आपल्या सरकारला नियमानुसार करता येईल. परंतु माहिती न घेता केवळ अंधारात बाण मारण्याचा केविलवाणा प्रयत्न मलिक करत आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली.