नवी दिल्ली – मालदीवने १८६ विदेशी नागरिकांना आपल्या मूळ देशांमध्ये परत पाठवले आहे. या विदेशी नागरिकांमध्ये भारताच्या ४३ नागरिकांचाही समावेश आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन आणि अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे केल्याचा आरोप करून या सर्वांना मूळ देशांमध्ये परत पाठवण्यात आले आहे.
परत पाठवलेल्यांमध्ये बांगलादेशच्या नागरिकांची संख्या सर्वात जास्त आहे. एकूण ८३ बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे. त्यापाठोपाठ भारताच्या ४३ जणांना परत पाठवण्यात आले आहे.
श्रीलंकेच्या २६ आणि नेपाळच्या ८ जणांनाही परत पाठवण्यात आले आहे. या सर्वांना कधी परत पाठवण्यात येणार आहे, हे अजून समजू शकलेले नाही, असे मालदीवमधून प्रसिद्ध होणाऱ्या माध्यमांनी म्हटले आहे.
मालदीवमध्ये बेकायदेशीपरपणे चालवले जाणारे उद्योग बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभुमीवर या विदेशी नागरिकांना परत पाठवले जाते आहे. वेगवेगळ्या नावांनी चालवल्या जाणारे बेकायदेशीर उद्योग बंद करण्यासाठी अर्थ मंत्रालयाबरोबर मिळून प्रयत्न सुरू असल्याचे गृह सुरक्षा मंत्री अली इहुसान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
इमिग्रेशनने गुन्हेगारी गुन्हे करणाऱ्या परदेशी कामगारांना शोधण्यासाठी केलेल्या ऑपरेशनमध्ये अनेक लोकांना ताब्यात घेतले, त्यापैकी वैध कागदपत्रे आणि पासपोर्ट असलेल्यांना हद्दपार करण्यात आले. इमिग्रेशन आणि पोलिस आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा छापे टाकत आहेत. हे ऑपरेशन कोणत्याही विशिष्ट गटाला लक्ष्य करत नाहीत, असेही ते म्हणाले.