मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावास तात्काळ मान्यता द्यावी
हिंजवडी – आयटी पार्क लगतची हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट न करता या गावांची “क’ दर्जाची स्वतंत्र नगरपरिषद करावी, अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी (दि. 23) विधानसभेत पावसाळी
अधिवेशनादरम्यान केली.
थोपटे यांच्या या मागणीबाबत राज्यातील शिंदे-भाजप सरकार काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. झपाट्याने वाढत असलेल्या आयटी परिसरातील गावांचा नियोजनबद्ध विकास व चेहरा मोहरा बदलण्यासाठी सरकारने अधिक वेळ न घालवता तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी आयटीयन्ससह परिसरातील स्थानिक नागरिक करत आहेत.
आमदार थोपटे यांच्या या मागणीमुळे गेली अनेक वर्षांपासून महापालिका समावेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील नेते तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ही गावे पिंपरी चिंचवड महापालिकेत घ्यावीत म्हणून मागील पाच सहा वर्षांपासून आग्रही आहेत. तर संग्राम थोपटे यांनी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा रोख ओळखून या भागासाठी स्वतंत्र नगरपरिषदेची सरकारकडे मागणी केली आहे. तसा प्रस्ताव देखील राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेत तरी समाविष्ट करा किंवा स्वतंत्र नगरपालिका अथवा नगरपरिषद करा, असा सूर येथील ग्रामस्थांकडून ऐकायला
मिळत आहे.
वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा पुरविण्यात येथील ग्रामपंचायतीवर मोठा ताण येत आहे. या भागात बकलपणा वाढत चालला आहे. त्यामुळे या सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होऊ लागली आहे. गावांच्या समावेशाबाबत किंवा स्वतंत्र आस्तित्वाबाबतचा प्रलंबित प्रश्न आता शिंदे सरकार तरी मार्गी लावेल का असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत. ही गावे महापालिकेत न घेता या गावांची मिळून एक स्वतंत्र नगरपरिषद किंवा “क’ दर्जाची नगरपालिका करा असाही काहींचा सूर आहे.
महापालिकेच्या समावेशास येथील ग्रामपंचायतीचा विरोध कायम असून, त्यांनी तसा ठराव देखील यापूर्वी केला आहे. तर बकालपणा वाढत असल्याने त्यातील काही ग्रामपंचायतींनी ही गावे महापालिका हद्दीतच घ्यावीत, असा देखील ग्रामसभांमध्ये ठराव मांडला आहे. त्यामुळे या समाविष्ट गावांचे घोंगडे तसेच भिजत पडले आहे. त्यावर कोणताही तोडगा निघत नसल्याने अखेर पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा या विषयाकडे या भागाचे आमदार संग्राम थोपटे यांनी स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी करून सरकारचे लक्ष वेधले आहे.
एक स्वतंत्र क वर्ग दर्जाची नगरपरिषद तयार करण्यात यावी याबाबतचा ठराव देखील काही ग्रामपंचायती कडून करण्यात आला आहे. तसेच शासनानेही या बाबतचा अभिप्राय सरकारकडे मागविला आहे, परंतु सरकारकडे या बाबतचा प्रश्न प्रलंबित आहे. तरी जनभावना लक्षात घेऊन लवकरात लवकर याबाबतीत निर्णय घेऊन या भागासाठी स्वतंत्र नगरपरिषद करावी अशी मागणी मी अधिवेशनात केली आहे.
– संग्राम थोपटे, आमदार.