पुणे -‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावे. त्यातून त्यांना तातडीने मदत देता येईल, असे निर्देश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
‘निसर्ग’चक्रीवादळामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा पवार यांनी शनिवारी घेतला. लोकप्रतिनिधींच्या सूचनांवर मंत्रिमंडळ बैठकीतयोग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. यावेळी कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, अशोक पवार, सुनील शेळके, अतुल बेनके, संग्राम थोपटे, सुनील टिंगरे या पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा. वीजेचे खांब उभे करणे, गरज भासल्यास दुसऱ्या जिल्ह्यातील मनुष्यबळाची मदत घेणे, आदिवासी-बिगर आदिवासी भागातील लोकांना तातडीने मदत देणे, घर, शाळा, अंगणवाडी दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करणे, अशा सूचना पवार यांनी. पूर्वीच्या शासन निर्णयानुसार मदतीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही पवार म्हणाले.
बाळहिरडा वनस्पतीचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी भागातील हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना वेगळा मापदंड लावून नुकसान भरपाई देण्याचा विचार व्हावा. आदिवासी भागात घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी तातडीने मदत व्हावी.
– दिलीप वळसे पाटील, कामगारमंत्री