शिक्रापूर-धामारी (ता. शिरूर) येथे एकाने जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाला तर नातवाने सख्या आजीला मारहाण करून जखमी केले असल्याची घटना घडली.
याबाबत संतोष बाळू केदारी (रा. धामारी) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी रवींद्र बाळू केदारी व गौरव रवींद्र केदारी (दोघे रा. धामारी) या बाप लेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. संतोष केदारी व रवींद्र केदारी या सख्ख्या भावांमध्ये वडिलोपार्जित घर व जमिनीबाबत वाद आहे.
संतोष केदारी हे त्यांचा भाऊ रवींद्र याच्याकडे जाऊन रानातील घराची चावी मागितली असता रवींद्र याने चावी देणार नाही असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. रवींद्र याने लोखंडी गजाने तसेच रवींद्रचा मुलगा गौरव याने टिकावाने संतोष यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी संतोष याला वाचविण्यासाठी त्याची आई वत्सलाबाई आलेली असता गौरव याने त्यांना लोखंडी गजाने मारहाण केली. या मारहाणीमध्ये संतोष बाळू केदारी व त्यांची आई वत्सलाबाई बाळू केदारी हे दोघे जखमी झाले आहेत.