नवी दिल्ली : तापमान वाढल्यावर कोरोना टिकणार नाही आणि उन्हाळ्यात भारतात तो पसरणार नाही, हा लोकप्रिय समज सिध्द होऊ शकलेला नाही, असे भारत सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. या विषाणूंच्या वर्तणुकीचा अभ्यास अद्याप सुरू आहे. त्यामुळे उच्च तापमानात तो नाहीसा होईल, या सर्वसाधारण अपेक्षेला अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही, असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
यावावत सर्व तथ्यांचा अभ्यास सुरू आहे. कोणताही निष्कर्षाप्रत अभ्यास झालेला नाही. तापमान वाढल्यानंतर विषाणूंचे जगणे कठीण होते, मात्र ते अद्याप निश्चित झाले नाही, असे केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. आरोग्य क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी या आधी तापमान वाढल्यावर त्याचा प्रसार रोखला जाईल, असे म्हटले होते. मात्र ती खोटी आशा असेल, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चीनमध्ये अलीकडे केलेल्या अभ्यासात 8.72 अंश सेल्सियसपेक्षा तापमानात वाढ झाल्यानंतर बाधीतांच्या संख्येत घट झाल्याचे आढळले होते. त्यामुळे उच्च तापमानात हा विषाणू तग धरणार नाही, असे मानण्यात येत होते. साथीरोग तज्ज्ञांच्या मते, तापमान आणि आर्द्रता वाढल्यांतर या विषाणूंची कुवत/क्षमता कमी होईल. मात्र तो पुरता नाहीसा होईल, याची खत्री देता येत नाही. फ्लूप्रमाणे हवामानातील बदलांचा त्यावर परिणाम होईल, असे मानता येत नाही.
उन्हाळ्यात हा फ्लू प्रमाणे नाहीसा होईल, अशी अपेक्षा करणे चुकीचे होईल आणि आपण तसे गृहीत धरू शकत नाही. तसा त्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक माईक रीयान यांनी स्पष्ट केले आहे.