मुंबई – शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याचे दुःख भाजप नेत्यांना प्रचंड झाल्यामुळे आता हे लोक उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वडीलांचा वारसा शिकवण्याचे काम करत आहेत. भाजपचे दु:ख आम्ही समजू शकतो. जो निकाल उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लागला असाच निकाल 2024 च्या निवडणुकीत येईल, त्यामुळे भाजपने आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपला दिले.
महेश तपासे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. 2019 मध्ये भाजपची राज्यातील सत्ता गेल्यानंतर हा पराजय त्यांच्या पचनी पडलेला नसावा, त्यातून हे आरोप होत आहेत, सोमय्या यांच्या काही आरोपांमध्ये तथ्यच नसल्याचे ताशेरे कोर्टानेही ओढले आहेत, असा टोला तपासे यांनी लगावला. राणा दाम्पत्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान देऊन शिवसैनिकांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केली. यातून त्यांचा सामाजिक वातावरण बिघडविण्याचा हेतू स्पष्ट असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केला.
कोणत्याही पक्षाच्या नेत्याबाबत कोणी वक्तव्य केल्यास त्या पक्षातील कार्यकर्ता नेत्याच्या रक्षणासाठी पुढे येणारच, असे मत तपासे यांनी व्यक्त केले. भाजपच्या नेत्यांबाबत कोणी वक्तव्य केल्यास त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेदेखील पुढे नक्कीच येतील असे तपासे म्हणाले.
राणा दाम्पत्याला पोलिसांनी कलम 149 ची नोटीस देऊनही ते मातोश्रीवर जाण्याच्या भूमिकेवर ठाम होते. शेवटी त्यांनी माघार घेतली. मात्र अटक केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना खालच्या पातळीवर शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न तपासे यांनी उपस्थित केला. तसेच जी कारवाई पोलिस विभागाकडून करण्यात आली त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव नसल्याचे ते म्हणाले.
सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींनी बोलण्यात तारतम्य ठेवावे. धोरणात्मक टीका जरूर करावी मात्र व्यक्तिगत राजकारण करू नये, असा सल्लाही तपासे यांनी दिला. धोरणांच्या संदर्भात आक्षेप असावा मात्र व्यक्तिगत द्वेष कुठेही नसावा,
अशी शिकवण शरद पवार यांनी सातत्याने आम्हाला दिली आहे. अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षाने ठेवावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे मोहीत कंबोज यांनी ट्विटरवरून केलेल्या वक्तव्याचा तपासे यांनी समाचार घेतला. हनुमान चालिसाचे पठण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असे म्हणणाऱ्या कंबोज यांचा अभ्यास किती याची कल्पना नाही. लोकांमध्ये सरकारविरोधी वातावरण तयार करण्याची भूमिका घेतल्याबद्दल राजद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. कंबोज यांनी केलेल्या वक्तव्यातून महाविकास आघाडी सरकार हनुमान चालिसेच्या विरोधात कसे आहे हे दाखविण्याचा त्यांचा अजेंडा आहे, असा आरोप तपासे यांनी केला.
तसेच नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांची दखल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे अशी माहिती तपासे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे. बहुजनांसाठी, आदिवासींसाठी स्वतंत्र तरतूद बजेटमध्ये महाराष्ट्राने केली आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणीदेखील महाराष्ट्राने केली. या पुरोगामी राज्यात अशी घटना घडेल यावर विश्वासच बसत नाही, असे तपासे म्हणाले. याशिवाय उत्तर प्रदेश राज्यात दलितांना पाय चाटायला लावले जाते यावर लोकप्रतिनिधींनी आवाज उचलायला हवा. तरीदेखील गृहमंत्री याची सखोल चौकशी करत आहेत असे तपासे म्हणाले.
औरंगाबाद जिल्ह्यात 9 मे पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आहे. अशातही राज ठाकरे सभा घेण्याची भूमिका घेतात. ही सभा केवळ धार्मिक वातावरण बिघडवण्यासाठी घेण्यात येत आहे. कालदेखील राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून भोंग्याच्या संदर्भात चर्चा केली. परंतु सामाजिक वातावरण दूषित करण्याचा एककलमी कार्यक्रम मनसेने स्वीकारला आहे, असा आरोप तपासे यांनी केला.