बारामती : बारामती तालुक्यातील कारखेल गावी सन 2015 साली आपल्या घरी दरोडा पडला आहे त्यात पत्नीला गंभीर मारहाण झाल्याचा बनाव पतीने रचला. मात्र, परिस्थीतीजन्य पुरावे, पती पत्नीतील अगोदरचे वाद त्यात झालेली तडजोड, तिच्या अंगावर चाकुने व कुऱ्हाडी सारख्या शस्त्राने केलेले असंख्य वार सरकारपक्षाने सिद्ध केल्याने पत्नी सोनालीच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याने पती महेंद्र महादेव भापकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
बारामतीचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.आर.राठी यांनी आज 22 एप्रिल रोजी हि शिक्षा सुनावली. कलम 498 खाली कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा अन्य नातेवाईकाविरुद्ध शाबीत न झाल्याने त्यांची मात्र पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली .
कौटुंबिक हिंसाचार कायदा कलम 498 व खुनाचा गुन्हा असल्याने हा खटला वैशिष्ट्यपूर्ण होता. सरकारी वकिल ॲड.संदीप ओहोळ यांनी सरकारपक्षातर्फे काम केलेल्या या खटल्याची पार्श्वभूमी अशी होती कि,
वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंतर्गत कारखेल गावी चेअरमन वस्ती येथे महेंद्र महादेव भापकर हे पत्नी सोनाली सोबत राहत होते. त्यांच्यात ती गरोदर असताना वाद झाल्याने ती बरेच दिवस माहेरी राहत होती. पतीने कौटुंबिक संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी दावाही केला. त्यानंतर तिला मुलगा झाल्यानंतर त्यांच्यात तडजोडनामा झाला. त्यानुसार ती आणी पती वेगळे राहण्याचा निर्णय झाला होता.
मुळची तिखी ता. कर्जत, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असलेली सोनाली हिचा विवाह 2012 साली झाला होता. 2014 साली तिच्या वडीलांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या सासरच्या लोकांनी त्यांच्या आजारपणात खर्च केल्याने त्यांचे थोरले जावई यांना सुमो जीप दिली. सदर जीप मला दिली नाही ,हुंडा आणला नाही व जमीनीत हिस्सा देत नाही या कारणावरुन पत्नी सोनालीचा छळ होत होता अशी तक्रार तिच्या चुलत काकानी वडगाव निंबाळकर येथे दिली.
खुनाच्या दिवशी राजहंस भापकर नावाच्या व्यक्तीने तुमच्या पुतणीच्या घरावर दरोडा पडला असुन तिच्या कानावर तोंडावर वार झाले आहेत तरी त्वरीत या असा फोन केला. कारखेलला आल्यावर तिला भोसकल्याचे व अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्याचे पाहुन ती मृत झाल्याने तिची उत्तरीय तपासणी करण्यात आली. सासरच्या लोकांच्या छळाची व त्यांच्यावर संशय असल्याची तक्रार तिचे चुलत काका पांडुरंग दादा पवार यांनी वडगाव निंबाळकर येथे दिली. पोलिसांनी तपास करुन सासरच्या लोकांवर कौटुंबिक हिंसाचार व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनावणी दरम्यान सरकार पक्षाच्या वतीने ॲड संदीप ओहोळ यांनी 9 साक्षीदार तपासले. फिर्यादीसह मयत सोनालीची आई, पंचनाम्यातील पंच, तपास अधिकारी गजानन गजभारे यांचेसह डॉ. दिलीप झेंडे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या .
सरकारपक्षातर्फे परिस्थितीजन्य पुरावे सिद्ध करताना आवश्यक बाबीबाबत उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक खटल्यांचे दाखले देण्यात आले. तसेच बचाव पक्षातर्फे ॲड. विजयराव मोरे यांनी देखील अनेक संदर्भ दिले. न्यायमुर्ती आर.आर.राठी यांनी वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष, आरोपीने फ्रिज वरुन कपड्यातुन काढुन दिलेला चाकु, अनेक गंभीर जखमा भोसकुन केल्याच्या खुना तसेच मृत पत्नीच्या फक्त पोटातच सकाळी सकाळी केलेले वार महत्वाचे पुरावे मानले गेले. कारण जर ती जागी असती तर नक्की प्रतिकार झाला असता व ईतर ठिकाणी जखमा दिसल्या असत्या.
याशिवाय त्यांच्यात पुर्वी झालेल्या तडजोडी मधे पती पत्नी दोघे वेगळे राहत होते,त्यांच्या खोलीचा दरवाजा कडी चोरटयानी तोडले नव्हते ,कोणतेही दागीने चोरील गेले नव्हते याबाबत आरोपी स्पष्टपणे काहीच सांगु शकला नाही तसेच त्यांची खोली वेगळी व ईतर सासरच्यांची वेगळी असल्याचे पुराव्यात दिसुन आले . या सर्व बाबी वरुन तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षीतुन आत्महत्येचा प्रकार शक्यच नसल्याचे पुढे आल्याने, रक्ताचा चाकु, कपडे वै. सर्व बाबी समोर आल्याने पतीने खुन केल्याचे सरकारपक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरुन पती महेंद्र महादेव भापकर याला खुनाच्या गुह्यामधे आजन्म कारावास ची शिक्षा सुनावली.
बचाव पक्षाचे वकिल ॲड. विजयराव मोरे यानी पोलिसांनी खोटा पंचनामा तयार केला असल्याचा बचाव करीत कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा शाबीत होत नसुन पत्नीने त्याबाबत अगोदर कुठेच तक्रार दाखल केली नव्हती. असा बचाव केला त्यावरुन पतीसह सासरच्या ईतर नातेवाईकांची कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या गुन्हायातुन निर्दोष मुक्तता केली .
मुलाला मदत करण्याचे आदेश…
आईचा खुन झाला वडीलाना शिक्षा झाली त्यामुळे लहान मुलगा शौर्य याला जिल्हा विधी सेवा समिती द्वारे नुकसानभरपाई / मदत देण्याचे आदेश देखील जिल्हा न्यायाधीश आर आर राठी यानी दिले आहेत