जामखेड / कोपरगाव – शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाशिवआघाडी राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचे वृत्त येताच तिनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. मात्र कॉंग्रेसच्या संदिग्ध भूमिकेमुळे सरकार स्थापनेचा दावा दाखल न करता आल्याने काही क्षणातच कार्यकर्त्यांच्या पदरात निराशा पडली.
जामखेड येथे कॉंग्रेसने शिवसेना, राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचे वृत्त येताच शहरातील खर्डा चौकात तिनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जय शिवाजी, जय भवानी व महाशिवआघाडीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशीद, उपप्रमुख नागराज जंगम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. अविनाश पवार, सुरेश भोसले, कॉंग्रेसचे रमेश आजबे, सय्यद जमीर, संतोष वाळुंजकर, संघटक गोकुळ, आमटे, जामखेड शहरप्रमुख गणेश काळे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुका प्रमुख नासिर खान, उपप्रमुख रफिक कुरेशी, युवासेना तालुका प्रमुख नीलेश पवार, सुहास मदने, जामखेड युवा शहर प्रमुख शशी खटावकर, सूरज काळे, खर्डा शहर संघटक महेश भोसले, अक्षय कवादे उपस्थित होते.
कोपरगाव शहरातही महाशिवआघाडीची सत्ता स्थापन होणार, असे जाहीर होताच कोपरगावमध्ये तिनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करून फटाक्यांची आतषबाजी केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत आपल्या या पक्षांचा जयजयकार केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, कॉंग्रेसचे अशोक खांबेकर, डॉ. अजय गर्जे, शिवसेना शहर प्रमुख सनी वाघ, असलम शेख, भरत मोरे, राजेंद्र बोरावके या प्रमुख कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर फटाक्यांची आताषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात शिवाजी महाराज पुतळ्या समोर आनंद साजरा केला. मात्र हा आनंद औटघटकेचा ठरल्याने कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा पडली. कार्यकर्त्यांमध्येही राज्यात सत्ता स्थापन होऊन जिल्ह्यात कोणाला मंत्रीपदे मिळते अशीही चर्चा सुरु झाली