देहुरोड – कार्तिकी एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र देहू येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने लगबग सुरू झाली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून वैष्णव, भाविक-भक्त, कार्तिकी एकादशीनिमित्त देहू-आळंदी येथे येत असतात. दोन आठवड्यावर म्हणजे 23 नोव्हेंबर कार्तिकी एकादशी होत आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर यांची संजीवन समाधी सोहळा संपन्न होत असते.
“याची देही याची डोळा’ संजीवन समाधी सोहळा पाहण्यासाठी भाविक तीर्थक्षेत्र आळंदी येथे येत असतात. त्यामुळे येणारा भाविक हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज तसेच संत ज्ञानेश्वर यांचे दर्शनार्थ देहू-आळंदी असा प्रवास करतात. दि. 20 ते 26 नोव्हेंबर दरम्यान हजारो भाविकांचे प्रतिदिन ये-जा होणार आहे.
या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी संस्थानच्या वतीने विविध प्रशासकीय व निमशासकीय विभागांशी पत्रव्यवहार करण्यात येत असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांनी दिली आहे.
भाविकांना विविध सोयी-सुविधा देण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, महावितरण केंद्र, पीएमपीएमएल बस, महाराष्ट्र राज्य परिवहन, पाटबंधारे, पोलीस प्रशासन, महसूल विभाग व त्या अनुषंगाने येणारी विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी सेवा पुरवित असतात. यामध्ये ग्रामपंचायत दुवा म्हणून काम करीत असते. कार्तिकी एकादशीनिमित्त होणाऱ्या गर्दीने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
काही दिवसांपासून रजेवर असून, दोन दिवसानंतर हजर होणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेच्या अनुषंगाने असणारी सर्व कामे करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले, असे ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर यांनी सांगितले.