न्हावरे – येथील तीन हिरकणी करोनाच्या लढाईत आरोग्यसेवेचे व्रत हाती घेऊन करोना रुग्णांची सेवा करत आहेत. संपूर्ण जगात करोनाचा कहर सुरू असताना प्रशासन, डॉक्टर, पोलीस यांच्यासह सर्व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीवाची बाजी लावून अहोरात्र कशाचीही पर्वा न करता देशसेवा करत आहेत.
अशाच प्रकारे न्हावरे गावच्या उषा गारगोटे, तेजश्री कोरेकर, शर्मिला साठे-धुमाळ या तीन हिरकणी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांची काळजी घेत त्यांना धीर देत असल्याने या तीनही हिरकणींवर न्हावरेसह संपूर्ण शिरूर तालुक्यातून कौतुकाचा वर्षावर होत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तू चाल पुढं तुला गं हिरकणी भीती कशाची.. या गीताने त्यांना मानवंदना देण्यात येत आहे.
उषा गारगोटे या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आयसीयू वॉर्डात कार्यरत असून त्या करोनाबाधित व्यक्तींची काळजी घेत आहेत. तेजश्री गिरीष कोरेकर या काशीबाई नवले मेडिकल हॉस्पिटल येथे स्टाफ नर्स म्हणून करोना लढाईत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. त्याचप्रमाणे शर्मिला साठे-धुमाळ या ससून रुग्णालयात 1993 पासून कार्यरत आहेत.
सध्या त्या करोनाच्या लढ्यात परिचारिका व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. करोनाशी थेट संपर्क असणाऱ्या नर्सेसना प्रशिक्षण देतात. त्याचप्रमाणे ससूनमधील नर्सेस कोविडमध्ये ड्युटी बजावत असताना आणि त्यानंतर क्वारंटाइन काळात हॉटेलमध्ये राहात असताना त्यांच्या जेवण आणि राहण्याची संपूर्ण जबाबदारी त्या सांभाळत आहेत.
लॉकडाऊनमध्ये आपल्या कामातून देशसेवेला महत्त्व देणाऱ्या न्हावरे गावच्या तीनही कन्या आपली लहान मुले दूर ठेऊन करोनाशी लढत आहेत. करोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवा बजावणारे सगळेच प्राणपणाला लावून काम करत आहेत. मात्र, न्हावरे गावाच्या तीनही हिरकणी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना त्यापेक्षा जास्त आरोग्य सेवेचे कार्य करत आहेत.
… त्याची कल्पना न केलेलीच बरी
रुग्णालयात सेवा बजावत असताना प्रोटेक्टिव किट अंगावर चढवणे व उतरवणे याला एक सिस्टिम आहे. या प्रक्रियेला साधारण 15 ते 20 मिनिटे लागतात. त्यामुळे एकदा हे किट घातले की 6 ते 7 तास दिवसा व रात्रपाळीत 8 ते 10 तास काढता येत नाही. या दरम्यानच्या काळात त्यांना पाणी पिणे किंवा नैसर्गिक विधीलासुद्धा जाता येत नाही. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीतही करोनाशी दोन हात करणाऱ्या या योद्ध्यांचे काय हाल होत असतील याची कल्पना न केलेलीच बरी.