तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबत महाराष्ट्र प्रभावीपणे काम करत आहेत. गेल्या तीन वर्षात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने मोठी प्रगती केली आहे. ‘एनईपी’ ही नवीन पिढी घडविणारी चळवळ आहे. युवाशक्ती भारताची सर्वात मोठी ताकद असून, त्याला क्रयशीलतेत रूपांतरित करण्याच्या दृष्टीने एनईपी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या धोरणाकडे सकारात्मक अंगाने पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागांतर्गत ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: आव्हाने आणि संधी’ या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन डॉ. देवळाणकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राज्य सरकारच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विजय खरे, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. रवींद्र क्षीरसागर, डॉ. शिरीश पिंगळे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. रूपकमल भोसले, प्रा. प्रदीप कदम आदी उपस्थित होते.
डॉ. नितीन करमळकर, डॉ. विजय खरे, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. यशोधन मिठारे, डॉ. रवींद्र क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी लोणावळा कॉलेजचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख होते.
प्रास्ताविक डॉ. संभाजी मलघे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सत्यजित खांडगे, प्रा. संदीप कांबळे, प्रा. राधा गोहाड, प्रा. दीप्ती कन्हेरीकर यांनी केले. आभार प्रा. रूपकमल भोसले, डी. डी. भोसले यांनी मानले.
धोरणात ग्रामीण विद्यार्थ्यांबाबत विचार
धोरणाची अंमलबजावणी करीत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबाबत काय विचार केला आहे. आर्थिक सक्षमता, पुरेसे मनुष्यबळ, इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, याबाबत संभ्रम कायम आहे. क्लस्टर कॉलेज संकल्पना शहरात राबविणे सोयीस्कर आहे. कोणतेही धोरण गृहीतकावर अवलंबून असता कामा नये, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी व्यक्त केले.