सोमाटणे, (वार्ताहर) – प्रत्येक वर्षी १ एप्रिलपासून टोलदरवाढ केली जाते. यंदा ही दरवाढ न झाल्याने प्रवाशांच्या खिशाला बसणारा भुर्दंड वाचला असून, नियमित मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
एक एप्रिल पहाटेपासून नवीन टोलदरवाढ होणार ही गोष्ट अटळ असे समजून आपल्या खिशाला किती टक्क्यांचा भुर्दंड बसणार याचा विचार पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून नियमित प्रवास करणारे वाहनचालक, मालकांना पडला होता.
अगोदरच पेट्रोल, डिझेल, सीएनजी इत्यादींचे दर गगनाला भिडले असून तो सर्वच वाहनचालकांच्या दृष्टीने आवाक्याबाहेर गेला होता. या दरवाढीमुळे वाहने वापरणे हे मध्यम वर्गीयांच्या दृष्टीने कठीण झाले आहे.
प्रत्येक वर्षी टोलदरवाढ एक एप्रिल पहाटेपासून लागू केली जाते. सद्यःस्थितीत पूर्वीच्याच टोलदराप्रमाणे टोल वसुली सुरू आहे. सध्या कोणतीच वाढ न झाल्याने वाहनचालक, मालकांना टोल दरवाढीतून काहीसा दिलासा मिळाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱयांनी समाधान व्यक्त केले.